ठाकरे सरकारने आरोपपत्र दाखल केलेच नाही!
पालघर : पालघर साधू हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी २८ जणांना स्थानिक न्यायालयाकडून सोमवारी जामीन मंजूर करण्यात आला. गुन्हा घडल्यापासून ९० दिवसांच्या आत कुठलेही आरोपपत्र सरकारकडून दाखल केले गेले नसल्याने त्यांना जमीन मंजूर करण्यात आल आहे. डहाणू येथील न्यायदंडाधिकारी एम.व्ही. जावळे यांनी आरोपींना जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिल्याची माहिती वकील अमृत अधिकारी यांनी दिली.
पोलिसांना त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत आणि त्यांच्यावरील आरोपपत्र अद्याप सादर झालेले नाही, असे अधिकारी यांनी युक्तिवाद केल्यावर २८ आरोपींना जामीन मंजूर झाला. याबाबतीत बोलताना अधिकारी यांनी सांगितले की, या प्रकरणात दाखल केलेल्या दोन प्राथमिक आरोपपत्रात या २८ जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे, मात्र यातील १८ जणांवर तिसऱ्या आरोप पत्रातही गुन्हा दाखल असल्यामुळे यांना पुन्हा अटक केली जाणार आहे.
पोलिसांच्या कामात अडथळा आणणे, दंगा करणे आणि खून करण्याच्या प्रयत्नांशी या संबंधित आरोपांमध्ये ४७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी हे आरोपपत्र दाखल केले गेले. पालघर जिल्ह्याच्या कासा परिसरातून १६ एप्रिल रोजी रात्री उशिरा १५४ लोकांना अटक करण्यात आली होती. पालघर जमाव बळी घटनेत संत कल्पवृक्ष गिरी, सुशीलगिरी महाराज आणि त्यांचा चालक निलेश तेलगडे यांचा मृत्यू झाला होता.