१० एप्रिल, १९४७ साली स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी पुढाकार घेऊन, कर्जत येथे ‘कोतवालवाडी ट्रस्ट’ची स्थापना केली. कोरोना काळात संस्थेने महत्त्वाचे समाजकार्य केले, त्याविषयी...
‘कोतवालवाडी ट्रस्ट’ हे हुतात्मा भाई कोतवाल यांना अभिप्रेत असलेली ग्रामविकासाची कामे करणारी सामाजिक संस्था कर्जत तालुक्यात कार्यरत आहे. संस्थेला ७५ वर्ष पूर्ण झाली असून, आजही ही संस्था नेरळमध्ये माथेरानच्या पायथ्याशी व आजुबाजूच्या परिसरात ग्रामीण जीवनाशी निगडित शैक्षणिक कार्यात व महिला सबलीकरणाचे आघाडीचे कार्य करत आहे. या संस्थेच्या साहाय्यामुळे २५०० हून अधिक ग्रामीण महिला स्वावलंबी झाल्या. घर-संसार सांभाळत रोजीरोटी मिळवत आहेत. वसतिगृहातील वनवासी विद्यार्थी शालेय शिक्षण पूर्ण करुन पुढील प्रगतीचे मार्ग मिळवत आहेत. ‘कोतवालवाडी ट्रस्ट’च्या साहाय्याने अनेक जणांनी व्यावसायिक शिक्षण घेतले. ते डॉक्टर, शिक्षक, आयटीआय, पॉलिटेकनिक व मॅनेजर अशी प्रगती करत ते ‘कोतवालवाडी ट्रस्ट’चे नाव त्यांनी उंचावले आहे.
कोरोना व्हायरसच्या महामारी संकटाला नेस्तनाबूत करण्यासाठी सरकारचे नियम पाळत महिला विकास केंद्र कामाला लागले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये अनेकांना नोकर्या गमवाव्या लागल्या, तर अनेकांवर पगार कपातीची आपत्ती ओढवली. परंतु, या काळातही ‘कोतवालवाडी ट्रस्ट’च्या हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्राने अनेक महिला, विशेषतः आपल्या केंद्रातून प्रशिक्षित रुग्णसेविकांना नोकरीच्या संधी देऊन खर्या अर्थाने आधार दिला आहे. लार्सन अॅण्ड टूब्रो ट्रस्टच्या संपूर्ण आर्थिक साहाय्याने हे प्रशिक्षण केंद्र मागील सात वर्षे कार्यशील आहे व २५०० ग्रामीण महिलांचे सबलीकरण या संस्थेने केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग दूर ठेवण्याच्या तरणोपायामुळे सरकारला लोकल ट्रेन व बस बंदच करावी लागली. ट्रेन बंद असल्यामुळे कल्याण, उल्हासनगर व अंबरनाथ हॉस्पिटलस येथे ये-जा करणाऱ्या कितीतरी मुलींच्या नोकऱ्या गेल्या. तेव्हा संस्थेने शक्य आहे त्या मुलींना नोकऱ्या शोधून दिल्या.
जनाई हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलींना नोकऱ्या मिळाल्या. नेरळ आसपासच्या पुढील हॉस्पिटल्समध्ये मुलींना नोकऱ्या मिळाल्या.
१.साई-श्रद्धा हॉस्पिटल- कडाव
२.सुविधा हॉस्पिटल- नेरळ
३.जनाई हॉस्पिटल- भिवपुरी
४.साई-श्रद्धा हॉस्पिटल- कळंब
५ डॉ. राकेश पाटील यांचे साई-श्रद्धा हॉस्पिटल
२०-२५ कुटुंबांमध्ये, वयोवृद्ध व रुग्णांकडे २४ तासांकरिता मदत यासाठी उत्तम रुग्णसाहाय्यक पुरवठा केंद्राने केला. ‘लॉकडाऊन’मध्ये कितीतरी मुलींनी कामे करुन आपली घरे सांभाळली आहेत. वडील मोलमजुरीसाठी उल्हासनगर व अंबरनाथ शहरांकडे जाऊ शकले नाहीत, पण या रुग्णसेविकांना कामे मिळाल्याने घरांचा उदरनिर्वाह चालला. वाड्या-पाड्यात दोन घरांमध्ये पराकोटीचे नैराश्य होते. एका घरातल्या कर्त्या पुरुषाने ‘लॉकडाऊन’, कोरोना आणि गरिबीमुळे आत्महत्या केली. कारण, ‘लॉकडाऊन’मुळे त्यांनी अर्थार्जनाचे साधन गमावले. घर कसे चालणार? चूल कशी पेटणार? मुलाबाळांना काय खायला घालणार? या निराशेतून त्या व्यक्तीने आत्महत्या केली. पण, त्यानंतर त्या कुटुंबाचे काय? तर या कुटुंबातल्या दोन मुलींचे समुपदेशन करून त्यांनाही स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण संस्था देत आहेत.
या सर्व काळात लार्सन व टुब्रो कंपनीने खूप मदत केली. कंपनीच्या आर्थिक साहाय्याने गेल्या सात वर्षांत तीसावी बॅच चालू आहे. येथील महिला विकास केंद्राने कोरोना काळात पूर्ण खबरदारी घेऊन ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करून आपले प्रशिक्षण वर्ग सुरू ठेवले. शहापूर, दिवा, उल्हासनगर, लोणावळा, बदलापूर, पनवेल अशा खूप दूरवरच्या ठिकाणी राहणाऱ्या मुली आहेत. आता ऑनलाईन ट्रेनिंग सुरु केले आहे. सर्व मुलींना रोज तीन तास लेक्चर घेतले जातात. व्हिडिओमार्फतही विषय समजावले जातात. मुख्यत: प्रथमोपचार व कोरोना महामारीचे उपचार समजावून सांगितले जातात. जेणेकरुन अज्ञानाची भीती जाऊन लक्षणे व इलाज करता आले पाहिजेत. मोठ्या दवाखान्यात बेड मिळेपर्यंत न डगमगता कोरोनाचा सामना करता आला पाहिजे. नोकरी करत असलेल्या आमच्या तीन रुग्णसेविका कोविड ‘पॉझिटिव्ह’ झाल्या. याबद्दल त्या म्हणतात, “आपण रुग्णसेवेचे काम पत्करले आहे, तर हा आजारही स्वीकारावा लागेल.” प्रभागातील रुग्णांनाही प्राणायाम शिकवत या स्त्रिया ऊर्जेचा स्रोत बनल्या. आमच्या संस्थेतील प्रत्येक शिक्षिकेचे हे यश आहे. भारती शिंगोळे, अर्पणा कर्वे, अमिता पाईकराव व अभिश्री कांबळे, अंजू पारधी व पॅरपेत फर्नांडिस यांच्या अविरत मेहनतीने योगदान चालूच राहील.
- संध्या देवस्थळी