लखनऊ : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोधाच्या नावाखाली दंगल उसळून सरकारी संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांना योगी सरकार कारवाई करण्यात कुठलीही कसर मागे ठेवणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हिंसा भडकवणाऱ्या सर्वांना धडा शिकवण्याचा निर्णय उत्तर प्रदेश पोलीसांनी घेतला आहे. योगी सरकारच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश पोलीसांनी नुकसानभरपाईची मोहिम आणखी कडक केली आहे. ८० हजार ८५६ रुपयांचा पहिला हप्ता दंगलखोरांकडून वसुल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दंगलखोरांना नोटीस बजावली होती. यात बेकनगंज येथील रहिवासी यासीन, नोबस्ता येथील रहिवासी मोहम्मद अरमान, बेकनगंज रहिवासी गुरगुट, इरफान, लिकायत आणि दिलशान आदींनी एकत्रित या रक्कमेचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केला. दरम्यान, कानपूर येथे गठीत करण्यात आलेल्या समितीच्या निष्कर्षात यतीमखाना येथे २ लाख ८० हजारांचे नुकसान वसुल करण्यासंदर्भात २१ जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अशाच प्रकारे अन्य ठिकाणीही वसुली आणि आरोपींची धरपडक सुरूच आहे.
कानपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात एकूण १२ जण गोळी लागून जखमी झाले. पोलीसांवर झालेल्या दगडफेक आणि हाणामारीत २६३ पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलीसांनी सीसीटीव्ही छायाचित्रण, व्हीडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांवर खटला दाखल करून दंगलीवेळी झालेल्या नुकसानीची भरपाई केली जाणार आहे. ज्या लोकांनी हिंसाचारात नुकसान केले ते त्यांना भरून द्यावेच लागणार आहे. त्यांनी जनतेच्या संपत्तीचे नुकसान केले आहे, सार्वजनिक मालमत्ता ही जनतेच्याच मालकीची आहे त्यामुळे त्यांनाच हे भरून द्यावे लागणार असल्याची भूमीका वारंवार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे.