एअर स्ट्राईक हा पाकिस्तानला इशारा होता...
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : वास्तविक नियंत्र रेषेवर (एलएसी) चीनने आगळीक करून मोठी चूक केली आहे. भारतीय सैन्याकडून मिळत असलेल्या सडेतोड प्रत्युत्तरामुळे चीनला आता पश्चाताप होत आहे. एलएसीवर कोणत्याही प्रकारचा बदल भारत स्विकारणार नाही, अशा शब्दात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी चीनला दिला आहे. एका वेबिनारमध्ये ते बोलत होते.
भारताची भूमिका अतिशय स्पष्ट असून त्यात कोणताही बदल होणार आहे. एलएसीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल अथवा तसे करण्याचा प्रयत्न भारत सहन करणार नाही. पूर्व लडाखमध्ये अद्यापही स्थिती तणावपूर्ण आहे. चीनने एलएसीवर जी काही आगळीक केली. त्याचे दुष्परिणाम आता त्यांना भोगावे लागत आहेत. एलएसीवरील आगळीकीस भारतीय सैन्याने ज्याप्रकारे सडेतोड उत्तर दिले आहे. त्याची कल्पना चीनने केली नव्हती. त्यामुळे चीनला आता आपल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे.
चीनसोबत युद्धाची शक्यतेविषयी सांगता येत नाही, मात्र विनाकारण होणाऱ्या चकमकी आणि तणावाच्या स्थितीकडे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचे सीडीएस जनरल रावत म्हणाले. पाकिस्तानने भारतासोबत जम्मू - काश्मीरमध्ये छद्म युद्ध छेडल्याचे सीडीएस जनरल रावत यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, त्यामुळे भारत आणि पाक संबंध अतिशय खराब झाले आहेत, पाकने दहशतवाद थांबविल्याशिवाय त्यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. भारताने बालाकोट येथे केलेला एअरस्ट्राईक पाकला स्पष्ट इशारा होता. दहशतवाद न थांबविल्यास अशाच प्रकारची कारवाई केली जाईल. त्यामुळे पाकिस्तानला हादरा बसल्याचेही ते म्हणाले.