नवी दिल्ली : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात पाच वर्षांत पाच कोटी रोजगार निर्मितीसाठी सरकार एखाद्या अभियानाप्रमाणे काम करत आहे, असे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. येत्या पाच वर्षात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग निर्मित उत्पादनांच्या निर्यातीचे प्रमाण ५० टक्क्यांवर नेण्याचे आणि जीडीपीमधील योगदान २९ टक्क्यांवरुन ५० टक्क्यांवर नेण्याचे सरकारने ठरवले असल्याचे गडकरी यांनी सांगितले. मुंबईत सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या ‘ग्लोबलाइजिंग दी ब्रॅण्ड खादी : दी प्राइड ऑफ इंडिया’ या विषयावरील परिषदेत बोलत होते. खादी हा महात्मा गांधीजींच्या विचारांचा आत्मा असून त्याच्या बळकटीकरणाची गरज असल्याचेही ते म्हणाले.
इंडिया आणि भारत यात नेहमी फरक केला जातो. रोजगाराच्या शोधात गावातले नागरिक शहरात स्थलांतर करतात. हे थांबवण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली. स्थलांतर थांबवण्यासाठी उत्तम रस्ते, शाळा, रुग्णालये आवश्यक आहेत. शेतीतून चांगले उत्पन्न मिळणे आवश्यक आहे, असे गडकरी यांनी सांगितले. ‘आधुनिकता आणि यांत्रिकीकरणासोबत रोजगाराच्या संधींकडे आपण लक्ष दिले पाहिजे. कमाल व्यक्तींच्या सहभागासह कमाल उत्पादनाची आपल्याला गरज आहे,’ असे गांधीजी म्हणायचे. नवीनतम शोध, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्यनिर्मित ज्ञान संपत्तीमध्ये रुपांतरित करण्याची आवश्यकता गडकरी यांनी व्यक्त केली. खादी क्षेत्राच्या बळकटीकरणाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. खादी आणि ग्रामोद्योगावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या मोठी असून, त्यातली उलाढाल वाढवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
खादीला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी खासगी क्षेत्राला केले. उद्योग क्षेत्राकडून साहाय्य मिळाल्यास खादीचा ब्रॅण्ड जगप्रसिद्ध होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. विकासाला चालना देणाऱ्या धोरणांवर काम सुरू आहे. अलिबाबाप्रमाणे भारत क्राफ्ट ई-मार्केट पोर्टल विकसित करण्यासाठी सरकार काम करत आहे. खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात थेट संपर्क यामुळे होईल. हे सरकार पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त असून जलदगतीने निर्णय घेणारे आहे. खादीच्या विकासासाठी आणि अधिकाधिक लोकांना रोजगार पुरवण्याच्या या प्रयत्नात सहकार्य करावे, असे आवाहन गडकरी यांनी उपस्थित उद्योग प्रतिनिधींना केले. जगाच्या कानाकोपऱ्यात खादी पोहोचण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. यावेळी राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सचिव डॉ. अरुण कुमार पांडा उपस्थित होते.