श्रीहरीकोटा : सोमवारची दुपार ही जगभरातील भारतीयांसाठी आनंदाची ठरली. अंतराळात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२चे सोमवारी (२२ जुलै) प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात यशस्वीरित्या झेपावले. चांद्रयान-२ हे पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे. भारताची ही दुसरी चंद्रमोहीम आहे. याआधी भारताने २००८मध्ये चंद्रयान १चे प्रक्षेपण केले होते.
अशी असेल चांद्रयान २ची पुढची वाटचाल...
- चंद्रापासून ३० किलोमीटरवर गेल्यानंतर 'चांद्रयान-२'ची गती कमी करण्यात येईल.
- भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. हे यशस्वी झाल्यास भारत जगातला चौथा देश ठरणार आहे.
- पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर ३ लाख ८४ हजार किलोमीटर इतके आहे.
- चांद्रयान-२ द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील.
- चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी रोव्हर 'विक्रम' उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल.
- त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल.
- त्यानंतर ६ ते ७ सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल.
- लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल.
- रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे ४ तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल.
- यानंतर पुढील १५ मिनिटांच्या आत इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.
ही आहेत चांद्रयान २ची वैशिष्ट्ये
- चांद्रयान २ चे वजन ३.८ टन इतके आहे
- भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान २ एक चांगले उदाहरण ठरणार आहे.
- चंद्राच्या पृष्ठभागावर हे यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रुवाजवळील भागाचा अभ्यास करणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat