मुंबई : येत्या काही दिवसांमध्ये मुंबईचे नागरिक उष्णतेने हैराण होते. परंतु, गुरुरवारी पहाटे झालेल्या रिमझिम सरींमुळे मुंबईसह उपनगरांमधील वातावरणामध्ये गारवा आला आहे. नुकतेच पुढील तीन दिवसांमध्ये राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानंतर ठाणे, मुंबई तसेच नवी मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरुवारच्या दिवसात मुंबई, कोकण तसेच गोव्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील अनेक शहरांमधील किमान तापमान ६ अंशाखाली उतरले असून आता महाराष्ट्रातही थंडीचे आगमन होईल अशी अपेक्षा आहे. सध्या राज्यामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे झाली आहे. उस्मानाबादेत १५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. या बरोबरच अहमदनगर, महाबळेश्वर, अमरावती, गोंदिया, नागपूर आणि वाशिममध्ये देखील तापमानात घट झाल्याची नोंद आहे.