शिमला : 'काँग्रेस आणि त्यांची गॅंग सीएएबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. लोकांना भडकावत आहेत. मी राहुल बाबांना आव्हान देतो की, संपूर्ण कायदा वाचा आणि सांगा की कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद कुठे आहे ते." असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिमला येथील एका कार्यक्रमादरम्यान केले. पुढे ते म्हणाले,"१९५०च्या नेहरू-लियाकत करारानंतर अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी वाटाघाटी झाल्या. परंतु त्यानंतर पाकिस्तान, बांगलादेशात धर्माच्या आधारावर छळ सुरु झाला. म्हणून पंतप्रधान मोदींनी अशा निर्वासितांना त्यांच्या देशात होणाऱ्या धार्मिक छळातून मुक्त करावे याकरिता सीएए आणले."
शिमला येथील ऐतिहासिक रिज मैदानाच्या टाका खंडपीठावर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत केले. यानंतर शाह यांनी सरकारच्या कामगिरीवर एक पुस्तिका प्रसिद्ध केली. अमित शाह म्हणाले की,"दहशतवाद असो किंवा नक्षलवाद, देशाच्या रक्षणासाठी या राज्यातील वीरांनी बलिदान दिले आहे. या राज्याला चार परमवीर चक्र देखील मिळाले आहेत. पहिले परमवीर चक्र मेजर सोमनाथ शर्मा याना मिळाले आहे .
Addressing a public meeting in Shimla. https://t.co/udwD8nHZGJ
— Amit Shah (@AmitShah) December 27, 2019
यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की," नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून मोदी सरकारने लोकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे." मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सरकारच्या दोन वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. ते म्हणाले की,"सीएम हेल्पलाईनवर तीन महिन्यांत ३० हजाराहून अधिक तक्रारींचे निराकरण झाले. जन मंचच्या माध्यमातून लोकांच्या तक्रारींचे जागेवर निराकरण केले जात आहे."