अशी रंगते ‘कापूस कोंड्याची गोष्ट’

    25-Nov-2019
Total Views | 394



‘अलबत्या गलबत्या’ च्या अभूतपूर्व यशानंतर बालरंगभूमी पुन्हा एकदा चर्चेत आली. प्रेक्षकांचे पाय पुन्हा एकदा बालनाट्याकडे वळू लागले. लहानग्यांमध्ये नाटकांची आवड निर्माण झाली. आपल्या आवडत्या कलाकारांना थेट समोरून बघणं, त्यांच्या कलाकृतीवर दाद देण, अप्रत्यक्षपणे त्यात सहभागी होण चिमुरड्यांना आवडू लागलं आणि बालनाट्यानच्या खिडकीवर पुन्हा ‘हाऊसफुल’ची पाटी झळकू लागली. असंच एक नवीन ‘हाऊसफुल’ बालनाट्य म्हणजे ‘कापूस कोंड्याची गोष्ट’...

नाटकाची सुरुवात होते ती प्रेक्षकांपासूनच... गोष्टीतला नायक अप्पू म्हणजे अतुल परचुरे प्रेक्षकांमधून रंगमंचावर एन्ट्री घेतात, येता येता ते त्यांच्या चिमुरड्या फॅन्ससोबत नृत्यही करतात. अप्पूच हेच नातं या लहानग्या प्रेक्षकांसोबत शेवटपर्यंत टिकून राहतं. झंपक सर्कसच्या अप्पू आणि त्याच्या मित्रांची ही गोष्ट... या गोष्टीत अप्पूसोबत आहे त्याच्या पिटुकला, हा पिटुकला म्हणजे त्याचा लाडका हत्ती बरं का... या दोघांसोबत आहेत त्यांचे मित्र दिपू, फज्जा सिंग सगळे मिळून त्यांच्या नवीन रिंगमास्टर ‘बंदुल खान’च्या आगमनाची तयारी करतायत. त्यानंतर सुरु होते नाटकाची कथा. ही कथा अप्पूचा वेंधळेपणा, रिंगमास्टरची शिस्त, पिटुकल्याचं गायब होणं, रिंगमास्टरची अट आणि चित्रकुट राज्याची राजकुमारी यांच्या भोवती फिरते. ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ सांगून कसा अप्पू यातून स्वतःची आणि सगळ्यांची सुटका करून घेतो, काय आहे नेमकी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ हे जाणून घेण्यासाठी हे नाटक एकदा आवर्जून पाहायलाच हवं.



संगीत आणि नेपथ्य ही नाटकाची भक्कम बाजू ठरलीय. मयुरेश माडगावकरांच सुमधुर संगीत, अतुल परचुरेंचा आवाज, गाण्याच्या आणि संगीताच्या जागा योग्य रीतीने हाताळल्यामुळे नाटकं बघताना रमायला होतं. सर्कशीचा तंबू, राजवाडा आणि जंगल असा हा नाटकाचा सेट. पहिल्या अंकात नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी साकारलेला सर्कशीचा तंबुच खराखुरा भासावा इतका हुबेहूब हा सेट, त्यातला पिटुकल्या हत्ती अगदी जिवंत हत्ती वाटतो. तर दुसऱ्या अंकात अमोघ वाघ यांची प्रकाश योजना नियॉन रंगातल्या जंगलात घेऊन जाते. त्यानंतर सुरु होतो तो प्रकाशाचा खेळ... त्यात उठून दिसते ती गीता गोडबोले यांची वेशभूषा आणि उलेश खंदारेंची रंगभूषा. वेंधळा पण गोड, भूतकाळातल्या घटनांमुळे सतत घाबरलेला अतुल परचुरेंचा अप्पू आपल्याला आरसा दाखवतो. अतुल परचुरेंचा अप्पू आणि बालकलाकार मैथिल पटवर्धनची राजकुमारी पाहून ‘मोहन’ आणि ‘माऊची’ आठवण प्रेक्षकांना नक्की येते. नाटकात जास्त भाव खाऊन जातो तो दुष्ट जादुगार खडकेश्वर. सुनील शिंदेनी साकारलेला खलनायक आपल्या अभिनयाच्या जोरावर मुलांना घाबरवतोही आणि हसवतोही! दिपू, ममद्या आणि पूर्ण गँग मिळून या सर्कशीला जिवंत करतात. पहिल्या अंकात भाषा समजण्यास थोडी जड वाटते पण दुसऱ्या अंकात मैथिलीच्या वावरण्याने ती हलकी फुलकी होते.

केवळ मनोरंजनच नाही तर पालकांना आणि पाल्यांना यातून आत्मबोधही होतो. करमणूकच नाही तर ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ या उक्तीची प्रचिती या नाटकांतून येते. चिन्मय मांडलेकर यांनी हे नवं कोरं बालनाट्य लिहीलं असून दिग्दर्शनाची बाजूही त्यांनीच सांभाळली आहे. बालनाट्याची भट्टी निर्माते श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव यांनी छान जमवून आणली आहे. ‘अष्टविनायक’ नाट्यसंस्थेची निर्मिती असलेलं हे नाटकं ‘झी मराठी’ने प्रस्तुत केलं आहे. बालनाट्य म्हणजे नेहमीच्या चिऊ-काऊच्या, जंगलाच्या गोष्टी या संकल्पनेला छेद देत हे नाटकं मानवी वास्तवावर उभं राहतं. अप्पुचा स्वभाव हा कुठेतरी आपल्या स्वभावाशी मिळता-जुळता वाटायला लागतो. केवळ लहान मुलं नव्हे तर त्यांच्या पालकांसाठीही हे नाटक बोध देणारं ठरतं. ही कापूस कोंड्याची गोष्ट बघण्यासाठी आणि सुमधुर बालगीतं ऐकत पुन्हा लहान होण्यासाठी, या नियॉनच्या जंगलाची आणि सर्कशीच्या तंबूची सफर मुलांसह पालकांनी एकदातरी करायलाच हवी...

- हर्षदा सीमा

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121