घनकचरा प्रकल्प साडेचार वर्षांपासून बंद; दररोज १२० टन कचर्याची निर्मिती
जळगाव :
जळगाव महापालिकेने बीओटी तत्त्वावर हंजीर बायोटेक या कंपनीला चालविण्यास दिलेला घनकचरा प्रकल्प गेल्या साडेचार वर्षांपासून बंद आहे. हा प्रकल्प बंद असला तरी या ठिकाणी दररोज महापालिकेतर्फे शहरातील सुमारे १२० टन कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या परिसराजवळ राहणार्या नागरिकांच्या आरोग्याचा धोका वाढला आहे. कचर्याच्या समस्येवर तोडगा निघाला नाही तर औरंगाबादप्रमाणे जळगावातही कचराकोंडी होण्याची शक्यता आहे.
महापालिकेने सन २००७ मध्ये हंजीर बायोटेक या कंपनीला शहरातील कचर्यावर प्रक्रिया करण्याचा ठेका दिला होता. यासाठी आव्हाणे शिवारातील ६ हेक्टर ५३ आर जागा घनकचरा प्रकल्पासाठी महापालिकेने हंजीर बायोटेकला जिल्हाधिकार्यांकडून मिळवून दिली होती. शहरातून दररोज संकलित होणारा १२० टन कचरा महापालिकेकडून येथे टाकण्यात येतो. पूर्वी ठेकेदार या कचर्यावर पाच प्रकारच्या प्रक्रिया करून खत निर्मिती करीत असे. मात्र जुलै २०१३ मध्ये ठेकेदाराने काम अचानक बंद करून कर्मचार्यांसह गाशा गुंडाळला होता.
लाखो टन कचरा पडून
घनकचरा प्रकल्पाचे काम थांबले असले तरी आरोग्य विभागाकडून दररोज सरासरी सुमारे १२० टन कचरा याठिकाणी टाकला जातो. गेल्या साडेचार वर्षांपासून येथे लाखो टन कचरा प्रक्रियेविना पडून आहे. या कचर्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसून तो केवळ डम्प करण्यात येत आहे. त्यामुळे कचर्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते. या समस्येमुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. तसेच जल व वायू प्रदुषणाचा धोका निर्माण झाला आहे. या परिसरात धुरामुळे प्रदूषण होत आहे.
अस्ताव्यस्त टाकला जातो कचरा
महापालिकेकडून पोकलँड मशिनच्या साह्याने कचरा डम्प केला जात होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाचे येथे असलेले पोकलँड मशिनदेखील त्यांनी परत घेतले. त्यामुळे कचरा डम्प करता येत नसल्याने कचरा ओव्हर फ्लो होत आहे. कचरा टाकणार्या घंटागाड्या व ट्रॅक्टर जागा मिळेल तेथे खाली होत असल्याने कचरा अस्ताव्यस्त पसरतो.
घनकचरा प्रकल्पाला मंजुरी
घनकचरा प्रकल्पाच्या ३०.७५ कोटी रुपयांच्या डीपीआरला राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ नुसार शहरातील कचर्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे.