महात्मा फुले जनआरोग्य योजना

    21-Nov-2018
Total Views | 59
 
 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
राज्यातील गरीब कुटुंबांना आरोग्याच्या विविध समस्यांबाबत योग्य व कमी खर्चात उपचार मिळावे, यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू करण्यात आली होती. राज्यात या योजनेचा पहिला टप्पा २ जुलै २०१२ पासून गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई उपनगर, मुंबई शहर या आठ जिल्ह्यांत कार्यान्वित करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून ही योजना राज्यव्यापी केली. २ जुलै २०१२ पासून ‘राजीव गांधी जीवनदायी योजना’ या नावाने ही योजना सुरू झाली. या योजनेची मुदत संपल्यामुळे शासनाने ही योजना काही नवीन बदल करून कायम ठेवण्याचे ठरविले. त्यानुसार राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ असे नवे नामकरण करण्यात आले. त्यानुसार महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त राज्य शासनाने ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.
 
 
राजीव गांधी जीवनदायी योजनेची मुदत १ ऑक्टोबर २०१६ रोजी संपली असून याच योजनेच्या नवीन स्वरूपाला ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ असे नाव देण्यात आले आहे. ही आरोग्य योजना राज्यात २ ऑक्टोबर २०१६ पासून राबविण्यात येत आहे.
योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घेण्याकरिता अंगीकृत रुग्णालयांमार्फत आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. या शिबिरात रुग्णांची तपासणी करून योजनेतील ९७१ उपचारांपैकी ज्या उपचारास सदर रुग्ण पात्र ठरतील त्यावर योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये मोफत उपचार केले जातात. अंगीकृत रुग्णालयाने प्रत्येक महिन्यात दोन आरोग्य शिबिरे आयोजित करणे अपेक्षित असते. याअंतर्गत ३० विशेषज्ञ सेवांतर्गत ९७१ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. सदर योजनेत लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्यांच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था यांचे आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्याच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, एन्डोक्राईन व इंटरव्हेशनल रेडिऑलोजी उपचार यासारख्या सेवांचा लाभ मिळतो.
 
 
 
योजनेची काही वैशिष्ट्ये
अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेल्या पिवळ्या शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना व अन्नपूर्णा योजनेत सामाविष्ट होणारे लाभार्थी व केशरी ( रु. १ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिकाधारक कुटुंबे या योजनेसाठी पात्र ठरतात.
 
 
नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी ठरतात.
 
 
रुग्णांची ऑनलाईन नोंदणीसाठी व रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आरोग्यमित्र मदत करतात. त्यासाठी सर्व अंगीकृत रुग्णालयात आरोग्यमित्र उपलब्ध आहेत.
 
 
रुग्णांची नोंदणी आरोग्य मित्रामार्फत केली जाते. रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी त्याचे ओळखपत्र पाहून केली जाते. ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणार्‍या कागदपत्रांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
 
या योजनेमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा असणार्‍या शासकीय, निमशासकीय, खासगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची निवड काही निकषांना आधीन राहून करण्यात आली आहे.
लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात उपचार घेऊ शकतो. सध्या योजनेमध्ये खासगी आणि शासकीय ४८९ रुग्णालये अंगीकृत केलेले आहेत.
योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घेण्याकरिता अंगीकृत रुग्णालयांमार्फत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात. या शिबिरात रुग्णांची तपासणी करून योजनेतील ९७१ उपचारांपैकी उपचारास सदर रुग्ण पात्र ठरल्यास त्यावर योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये मोफत उपचार केले जातात.
 
दावे करण्याची पद्धत
रुग्णांची रुग्णालयातून सुटी केल्यानंतर १० दिवसांनी आवश्यक कागदपत्रांसह दावे अंगीकृत रुग्णालयाद्वारे संगणक प्रणालीवर अपलोड केले जातात. अपलोड करण्यात आलेले दावे तपासणीसाठी टीपीएकडे येतात. सर्व आवश्यक कागदपत्रांसह संगणक प्रणालीवर सादर करण्यात आलेल्या दाव्यांना मंजुरी देण्यात येते. जर काही कागदपत्रे सादर केली नसल्यास दावे प्रलंबित ठेवून रुग्णालयांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाते. मंजूर करण्यात आलेल्या दाव्यांचे प्रदान विमा कंपनीद्वारे अंगीकृत रुग्णालयांना १५ दिवसांमध्ये करण्यात येते. कोणत्याही कारणांनी दावा मंजूर न झाल्यास, पहिले अपील विमा कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या स्तरावर तर दुसरे व अंतिम अपील मध्यवर्ती दावे समितीकडे करता येते.
 
 
 
योजनेच्या मदतीसाठी संपर्क
टोल फ्री क्रमांक - १५५३८८ / १८००२३३२२००
रुग्णालय आरोग्य मित्र
पत्ता पो. बॉक्स क्रमांक १६५६५, वरळी पोस्ट ऑफिस, वरळी, मुंबई ४०००१८
संकेतस्थळ
www.jeevandayee.gov.in
 
 
- कल्पेश गजानन जोशी
kavesh37@yahoo.com
 


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121