_H@@IGHT_600_W@@IDTH_800.jpg)
सर्वसामान्यांच्या दृष्टीने बँकांतील मुदतठेव ही सर्वांत सोपी व लाभदायी ठरते. ठेव विमा महामंडळाने दिलेल्या रु. एक लाखापर्यंतच्या विम्याच्या हमीमुळे ती अधिक सुरक्षित ही होते. पण तरीही ठेव ठेवताना आवश्यक ती काळजी घेतली न गेल्यास पस्ताव्याची पाळी येऊ शकते. त्यासाठीच खालील मुद्दे-
- बँक निवडताना बँकेचा ताजा ताळेबंद (जो सार्वजनिक असतो) जरुर पहायला हवा. हल्ली बहुतेक बँकांच्या शाखातून बँकेच्या ताळेबंदातील ठळक बाबी भित्तीफलकावर दाखवलेल्या असतात. जर त्या प्रदर्शित केल्या नसतील तर शाखा-व्यवस्थांपकांकडे मागाव्यात; अभ्यासाव्यात. बँकेचे एकूण भांडवल (वसूल भांडवल + राखीव निधी) एकूण मालमत्तेच्या तुलनेत किमान ९% हवे. हल्ली बहुतेक बँकांचे हे प्रमाण १२ % पेक्षा जास्त असते. ही गोष्ट समाधानकारक आहे. बँकेने गेल्या तीन वर्षात सतत नफा मिळवलेला असावा. एकूण थकित कर्जांचे प्रमाण ५% पेक्षा कमी असावे, निव्वळ थकित कर्जांचे प्रमाण २% पेक्षा कमी असावे. ठेवी व कर्जे यांचे एकमेकांशी असणारे प्रमाण साधारणत: ७५ % ते ८५%चे असणे योग्य. पण हे प्रमाण कमीजास्त असू शकते; त्यावर फार काही अवलंबून असेल असे नव्हे. सहकारी बँका त्यांच्या लेखापरीक्षणाचा दर्जा नमूद करतात. तो ‘अ’ असल्यास उत्तम!
- हल्ली अनेक बँकांच्या स्वत;च्या वेब साईट्स आहेत; त्या पहाता आल्यास बरे. विविध बँकांचे एकत्रित तुलनात्मक व्याजदरही उपलब्ध होतात. बाजारातील प्रचलित दरांपेक्षा जादा व्याज दर देणा-या बँकांचा विचार करताना सावधगिरीची गरज अधिक!
- प्रत्येक शाखेत ठेव विमा महामंडळाचा दर सहामाही हप्ता भरल्याचा दिनांक प्रदर्शित केलेला असतो. तो पहावा. (हा हप्ता दर सहामाहीस अगाऊ भरावयाचा असतो.)
- ठेव विमा महामंडळाची हमी रु. १ लाखापर्यंतच्याच ठेवींना असल्याने जर एखाद्या बँकेच्या सक्षमतेविषयी शंका असेल तर रु. १ लाखाहून अधिक (व्याजासह) रक्कम होणार नाही याची काळजी घेणे योग्य ठरेल. ठेव महामंडळ विम्याचे संरक्षण देताना एका व्यक्तीचे खाते, संयुक्त खाते - वेगळे मानते. त्यामुळे एकाच घरातील ठेवी ठेवताना अ, अ-ब, ब-अ,
अ-क, क-अ अशा विविध पद्धतीने ठेवी ठेवता येतील; व पूर्ण संरक्षण मिळवता येतील.

- बँकेची शाखा आपल्या परिसरातील असल्यास अधिक चांगले.
- मुदतठेव ठेवण्यासाठी संबंधित बँकेत बचत खाते असणे लाभदायक असले तरी बंधनकारक नाही. बचत खाते नसल्यास, फोटो, पत्त्याचा पुरावा, पॅनकार्डची कॉपी द्यावी लागते. पॅन कार्ड नसेल तर त्याऐवजी एक घोषणापत्र आवश्यक असते. अशावेळी वेगळी ओळख देखील द्यावी लागते. ओळखीऐवजी मतदानकार्ड /आधार कार्ड चालते.
- मुदत ठेवींचा कालावधी किमान ७ दिवसापासून ते कमाल १० वर्षापर्यंत असू शकतो. प्रत्येक बँक विविध कालावधीसाठी व्याज दर आपापला ठरवते. हे व्याज दर स्थिर पद्धतीचे असतात. ठेव ठेवल्या दिवशी जो व्याजदर कबूल केला असेल तो मुदत संपेपर्यंत बदलत नाही; मग भविष्यात व्याजदर कमी होवो अथवा जादा.
- रिझर्व्ह बँकेने ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षांवरील) व्यक्तींना प्रचलित व्याज दरापेक्षा १% अधिक व्याज दर देण्यास अनुमती दिली आहे. पण बहुतेक सर्व बँक अर्धा टक्काच अधिक व्याज दर देताना दिसतात. जर ठेव जोड नावांवर असेल तर पहिली व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक आहे. काही बँका हा अधिकच व्याज दर किमान एक वर्षांच्या ठेवींना देतात. अल्पमुदतीच्या ठेवींना देत नाहीत.
- संबधित बँकेचे सध्याचे कर्मचारी तसेच माजी कर्मचारी यांना देखील १% जादा व्याज मिळते.
- आवर्त ठेव (रिकरिंग) हा मुदत ठेवीचाच प्रकार होय. फक्त सर्व रक्कम आपण एकदम न भरता, दरमहा भरत असतो. त्यामुळे जसजशी रक्कम जमा होत जाईल तसतसे त्यावर व्याज वाढत जाईल. व्याज दर मात्र मुदत ठेवीचाच (काळानुरूप) दिला जातो. हे व्याज देखील चक्रवाढ पद्धतीचे असते. मुदत संपल्यानंतर किती रक्कम परत मिळेल हे आधीच सांगितले जाते.
हप्ते वेळेवर भरण्यासाठी कायमस्वरुपाची सूचना बचत खात्यास देता येते; त्यामुळे लक्षात ठेवण्याची गरज उरत नाही. मात्र बचत खात्यास पुरेशी ठेव ठेवणे आवश्यक.
जर एखाद-दुसरा महिना हप्ता भरण्यात चूक झाली तर बँका दंड आकारतात. खरे तर हा दंड नसून जी रक्कम बँकेस वापरता आली नाही त्याची ती भरपाई असते. मुदत संपल्यानंतर मिळणाऱ्या रकमेत काहीच बदल होत नाही.
रिकरिंग खाते मुदतपूर्व बंद करायचे झाल्यास व्याज मिळते. ते मुदत ठेव पद्धतीने, ज्या काळासाठी ठेव बँकेकडे होती, त्या काळासाठी ठेव ठेवल्या तारखेस जो व्याज दर असेल त्यापेक्षा १% कमी मिळते.
रिकरिंग खाते तीन महिने पूर्ण होण्याच्या आत बंद केले तर बऱ्याच बँका काहीच व्याज देत नाहीत.
जर आवर्त खाती काही महिने हप्ते भरले, व पुढे भरलेच नाहीत, तरीही ते मुदत पूर्व / मुदत संपल्यावर बंद करता येते. काही वेळा अशा प्रसंगी बँकेतील कर्मचारी काही वेळा ‘व्याज मिळत नसते असे सांगतात’; जे साफ चुकीचे आहे.
- बँकेत बचत खाते नसेल तर दर तिमाहीचे व्याज घेताना अडचण होते; पण दुस-या बँकेतील खात्यावर ही दर तिमाहीच्या व्याजाची रक्कम इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिमने जमा करता येतात. त्यासाठी जेथे बचत खाते आहे त्या बँकेचा एक रद्द केलेला धनादेश मुदतठेव ठेवताना द्यावा लागतो. बचत खाते नसल्यास, रु. २०,००० पेक्षा जास्त (व्याजासहितची) रक्कम बँका रोख देत नाहीत, तर डिमांड ड्राफ्ट/ पे ऑर्डरने देतात, हे ध्यानात घ्यावे .
- रिझर्व्ह बँकेने सर्वच बँकांना व्याजदर व त्यासंबंधातील नियम ठरविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे नुसतेच व्याजदर न पाहता पूढील प्रश्नांची उत्तरे देखील मिळवायला हवीत.
- व्याजदर नेमक्या किती दिवसांसाठी / महिन्यांसाठी आहे, कालावधी कमी जास्त केल्यास व्याजदरावर काय परिणाम होतो? उदाहरणार्थ एका बँकेने ६६६ दिवसासाठी जास्तीत जास्त व्याज दर जाहीर केला; तो हवा असेल तर रक्कम तितक्याच दिवसांसाठी ठेवायला हवी. ना कमी ना जास्त.
- व्याज दर तिमाहीस मिळणार की मुदत संपल्यावर- चक्रवाढ पद्धतीने एक रकमी मिळणार?
- पावती मुदत-पूर्व मोडायची वेळ आल्यास दंड-व्याज कसे असेल?
- सर्वसाधारणपणे रक्कम मुदतपूर्व देताना बँकेकडे जितका काळ ठेव रक्कम राहिली आहे त्या काळासाठी, मुदत ठेव ठेवल्या तारखेस जो व्याजदर होता, त्यातून १% किंवा २% कपात होते. पण त्यावेळी हे नेमके दर काय होते, ग्राहकास समजत नाही. ते समजावेत म्हणून ठेवीदाराने पावतीसोबतच त्यावेळच्या व्याजदराचा अधिकृत तक्ता मागून घेणे व तो मूळ पावतीसोबत ठेवणे हितकारक!
- पावतीची मुदत संपल्यानंतर पावतीचे नुतनीकरण आपोआप व्हायचे आहे की काय? (आपली स्वत:ची पसंती नोंदविता येते.)
_H@@IGHT_90_W@@IDTH_750.jpg)
- ठेव ठेवताना, शक्यतो जोड नावावर ( कोणाही एकास देय) पद्धतीने ठेवणे योग्य! पण अशी जोड नावावर ठेवलेली रक्कम मुदतपूर्व काढायची असेल अथवा तिच्यावर कर्ज हवे असेल तर सर्वांच्या सह्या / संमती आवश्यक ठरते. नुकताच एक प्रसंग ध्यानात आला. पावती पती-पत्नीच्या जोड नावे आहे. पत्नी रुग्णालयात दाखल असून शुद्धीवर नाही. पावती मुदतपूर्व मोडणे अथवा कर्ज घेणे अशक्य होऊन बसले. त्यामुळे काही रकमा या एक-एकट्याच्या नावावर ठेवणे देखील आवश्यक आहे. (अशा वेळी दुसऱ्याच्या नावे नामनिर्देशन मात्र अवश्यमेव करावे.)
- ठेव पावती जोड असो की एकट्याच्या नावे, नामनिर्देशन हवेच! बँका नामनिर्देशनाची पोच देतात. ती मूळ पावतीस जोडून ठेवावी. बँका नामनिर्देशित व्यक्तीचे नाव पावतीवर लिहित नाहीत. फक्त निर्देशन केले आहे, अशी नोंद करतात. नामनिर्देशित व्यक्तीचे नाव ठेवीदाराने आग्रह केल्यास नमूद करतात. तसा आग्रह धरणे फायदेशीर ठरते, असा अनुभव आहे.
- नामनिर्देशनाचा फॉर्म व्यवस्थित भरला आहे ना, याची खात्री करून घ्यावी. नामनिर्देशनाची अंमलबजावणी ग्राहकाच्या मृत्यूनंतर होत असल्याने त्यात ठेवीदाराच्या मृत्युनंतर काही दोष अढळल्यास त्यावेळी तो दुरुस्त करणे अशक्यच! अन मग नामनिर्देशन व्यर्थ ठरते.
- ग्राहकाच्या मागणीनुसार बँका व्याज मासिक देतात ही; पण कसर कापून! तेव्हा कसर कापूनही मासिक व्याज हवे का याचा निर्णय ग्राहकाने स्वतः घ्यायचा आहे.
- मुदत ठेवीचे वार्षिक व्याज रु. १०,००० पेक्षा जास्त होत असेल तर बँकांना आयकर कापून घेणे भाग असते. जर ठेवीदाराचे एकूण उत्पन्न करपात्र नसेल तर, त्यास दर वर्षी १५ जी किंवा १५ एच् चा फॉर्म देणे क्रमप्राप्त आहे. हे देताना पॅन कार्ड अत्यावश्यक असते; अन्यथा एरवी १०% ची आयकर-कपात दुप्पट म्हणजे २०% होते. जर ही कपात / किंवा दर वर्षी फॉर्म देणे टाळायचे असेल तर एका बँकेत रु. १०,००० हून जादा व्याज होणार नाही अशा रकमा ठेवाव्यात.
पूर्वी ही रु. १०,००० ची व्याज मर्यादा प्रति शाखा मोजीत असात. २०१४-१५ पासून आता ती मर्यादा प्रत्येक बँकेप्रमाणे मोजली जाते.
त्याच प्रकारे ठेवीदार जर सहकारी बँकेचा सभासद असेल तर व्याजावर कर कपात होत नसे; ती ही सवलत आता काढून टाकण्यात आली आहे.
- आयकर कापताना जोड खात्यासंदर्भात मुदतठेव पाहिले नाव असणा-याची मानली जाते हे लक्षात असू द्यावे.
- व्याजातून होणारी कर कपात ही आगाऊ भरलेल्या काराचाच प्रकार होय. जर आपले एकूण उत्पन्न करपात्र नसेल, व कर कापला गेला, तर वार्षिक आयकर विवरण-पत्र भरून तो परत मिळू शकतो; अर्थात यात उठाबशा या आल्याच!
- मुदत ठेव-पावती ताबडतोब मिळाली तर फारच चांगले; अनेकदा दुसरे-तिसरे दिवशी चक्कर टाकावी लागते. पावती आठवणीने आणावी; नंतर लक्षात राहणे कठिणच! अन् मग नुकसानच नुकसान! पावती मिळेपर्यंतच्या काळात बँकेने दिलेली कच्ची पावती जपून ठेवणे भाग आहे.
- हल्ली बऱ्याच बँका मुदत ठेव पावती न देता, ठेवीचे खातरजमा पत्र (Deposit Confirmation) देतात. हि मुदत ठेव पावती सारखेच दिसते. तपशील तसाच असतो; मात्र मुदत ठेव पावती मात्र नव्हे.
- पावतीची मुदत संपल्यानंतर १४ दिवसाच्या आत तिचे नुतनीकरण केले तरच पावती संपल्या तारखेचा व्याजदर नव्या पावतीस मिळतो. नाही तर मोठे नुकसान संभवते. हे टाळण्यासाठी, भिंतीवरील कॅलेंडरचा वापर करून त्या त्या वर्षात संपणा-या मुदत ठेवींच्या तारखा लिहून ठेवाव्यात; हे लिहिताना संबंधित तारखेपुढे फक्त बँकेचे नाव लिहावे; म्हणजे आवश्यक ती गुप्ताता सांभाळली जाईल.
- आजकाल बहुतेक सर्व बँका पावतीचे आपोआप नूतनीकरणाचा (auto renewal )पर्याय ग्राहकास विचारतात. या पर्यायासा जर आपण “होय” असे उत्तर दिले तर पावतीचे नुतनीकरण आपोआप होते. मूळ पावती ज्या काळासाठी ठेवली होती त्या काळासाठी तिचे नुतनीकरण होते. नूतनीकरणाच्या दिवशी त्या काळासाठी जो दर उपलब्ध असेल तो दिला जातो. व्याज दर नेहमीच बदलत असल्याने पूर्वीचा दर मिळेलच अशी खात्री नसतेच! आपणच सावध राहून आपल्याला हवा तो व्याजदर मिळतो ना याची खातरजमा करायला हवी.
बँकांचे विविध नियम जाणून घेत, सावधानतेने व्यवहार केल्यास आपले हित जपले जाईल.
-श्रीकांत जोशी