रिंकू राजगुरूच्या 'वारी'तली नांदी: भक्तिभाव, फुगडी आणि हरिनामाच्या गजरात हरवलेली आर्ची!

    04-Jul-2025   
Total Views | 11



the opening scene in rinku rajguru vari
 
मुंबई : पंढरपूरच्या वारीत हजारो वारकऱ्यांसोबत चालत, भजन गात, टाळ मृदंगाच्या तालावर नाचत जेव्हा एखादी तरुणी भक्तिरसात न्हालेली दिसते, तेव्हा ती केवळ एक अभिनेत्री राहात नाही ती त्या 'वारी'चा एक अविभाज्य भाग होऊन जाते. 'सैराट' मधून घराघरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिने यंदा आषाढी वारीत सहभागी होत स्वतः अनुभवलेली भक्ती, समर्पण आणि अध्यात्माची नितांतसुंदर झलक स्वतःच्या जीवनात जोपासली.

पारंपरिक पोशाखात, गळ्यात तुळशीची माळ घालून रिंकू वारीमध्ये सहभागी झाली आणि निःस्वार्थ भक्तीरसात रंगून गेली. सोशल मीडियावर तिचे फुगडी खेळतानाचे, भजनगायन करतानाचे काही क्षण व्हायरल झालेत, पण या क्षणांच्या मागे लपलेली ती आध्यात्मिक अनुभूती अधिक बोलकी आहे. केवळ अभिनय सादर करणारी रिंकू नव्हे, तर विठ्ठलाच्या चरणी मनोमन अर्पण करणारी रिंकू यावेळी दिसली.

पालखी सोहळ्याचं दर्शन घेताना तिच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि वारकऱ्यांमध्ये मिसळलेली तिची सहजता या गोष्टी प्रेक्षकांच्याही मनाला स्पर्श करून गेल्या. भजनात सहभागी होताना ती वारकऱ्यांसारखाच उत्साह घेऊन गात होती, आणि फुगडीतून तिच्या आनंदाला मुक्त वाट मोकळी झाली होती. हे क्षण केवळ सेलिब्रिटी उपस्थितीपेक्षा जास्त होते हे होते समरसतेचे, भक्तीचे आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतिबिंब.

वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, भक्तीची आणि श्रद्धेची शिरपेच आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी करतात. त्यांच्यासाठी ही केवळ यात्रा नसून ती एक जीवंत भक्तिपर्व असते. रिंकूसारख्या नव्या पिढीतील कलाकारांनी ही परंपरा अनुभवणं आणि तिचा भाग होणं म्हणजे आधुनिक पिढी व वारकरी परंपरेतील सेतू ठरण्याची सुरुवात आहे.

'वारी' अनुभवणे म्हणजे चालत, थकत, गात, नाचत, शेवटी आत्म्याला स्पर्शणारा अनुभव घेणे. रिंकूने तो अनुभव घेतलाच, पण आपल्या उपस्थितीतून अनेक तरुणांनाही वारकऱ्यांच्या या अखंड भक्तिपर्वात सामील होण्याची प्रेरणा दिली आहे. हे तिचं सादर करणं नव्हे, तर स्वतःला हरपून देणं होतं अगदी विठ्ठलाच्या चरणांशी एकरूप होऊन.


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121