मुंबई (प्रतिनिधी) : चारधाम यात्रेने (Chardham Yatra) नवा विक्रम रचल्याचे निदर्शनास येत आहे. यात्रेकरीता येणाऱ्या भाविकांची रेकॉर्ड ब्रेक संख्येची नोंद यंदा करण्यात आली आहे. यातून यमुनोत्री आणि गंगोत्री धामचे सर्व रेकॉर्ड मोडल्याचे दिसते आहे. मंदिर समितीने रात्री उशिरापर्यंत धामांमध्ये भाविकांसाठी दर्शन सुरू ठेवल्याने पोलीस-प्रशासनानेसुद्धा रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त ठेवला होता.
गेल्या वर्षी मे २०२३ रोजी सर्वाधिक १२०४५ यात्रेकरू यमुनोत्री धामला पोहोचले होते. यंदा यमुनोत्री येथे शेवटच्या दिवशी १२१४८ यात्रेकरूंनी नवा विक्रम निर्माण केला आहे. यमुनोत्रीनंतर भाविक गंगोत्रीला जातात. त्यामुळे गंगोत्रीलासुद्धा भाविकांच्या विक्रमी संख्येची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी १३६७० यात्रेकरू गंगोत्रीला पोहोचले होते यंदा हा आकडा १८९७३ वर पोहोचला आहे. दरम्यान प्रशासन, पोलीस आणि मंदिर समितीकडून यात्रेकरूंना अल्पोपाहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या सोयीसाठी गंगोत्री येथील बाजारही पहाटे दोन वाजेपर्यंत खुला होता.