शरद पवारांनी कृषीमंत्री असताना ठाणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी काय केलं?
खासदार कपील पाटील यांचा शरद पवारांना सवाल
12-May-2024
Total Views |
मुंबई : मला एकाने विचारले तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं. तेव्हा मी त्याला सांगितलं की, ते दहा वर्षे कृषी मंत्री होते. त्यांनी काय केलं? राज्यात त्यांचेच सरकार होते. त्यांनी ठाणे जिल्हयासाठी आणि ठाण्यातील शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल भिवंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणारे महायुतीचे उमेदवार खासदार कपील पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख न करता उपस्थित केला आहे.
ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स मैदानात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन १५ मे रोजी करण्यात आले आहे. या सभेची माहिती देताना खासदार पाटील यांनी उपरोक्त सवाल उपस्थित केला आहे.
खासदार पाटील यांनी सांगितले की, "आपल्याला नाशिक पुण्यावरुन आज भाजीपाला येतो. दुध आपल्याला बाहेरुन येते. ते आपल्याला आणावे लागले नसते. ठाणे आणि मुंबईची लोकसंख्या ही राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी २५ टक्के आहे. या जिल्ह्यातील पैसे दुसऱ्या जिल्ह्यात जातात. त्यांना लागणारे दूध हे नाशिक, धुळे, पुणे, कोल्हापूरहून येते. इथे आपल्या गोव्या नाक्यावर मदर डेअरी आहे. मदर डेअरीत दूध बारामतीचे येते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकडून दूध घेऊन याठिकाणी विकायचे. हा निर्णय मी घेतलेला नाही," असे ते म्हणाले.