दुसऱ्या संसदेची गरज नाही तर, दुसऱ्या मातोश्रीची काय गरज होती ?
- आ. नितेश राणेंचा राऊतांना सवाल
24-May-2023
Total Views | 99
मुंबई : खासदार संजय राऊत विचारतात नव्या संसद भवनाची देशाला गरज होती का? मग मी विचारतो एक मातोश्री असताना महापालिकेत भ्रष्टाचार करून बांधलेल्या दुसऱ्या मातोश्रीची काय गरज होती? असा सवाल आ. नितेश राणेंनी केला आहे. राऊतांच्या प्रश्नावर राणेनी खरपुस समाचार घेतला आहे.
नितेश राणे म्हणाले, "येत्या 28 तारखेला सावरकर जयंतीनिमित्त नव्या संसदेचे उदघाटन होत आहे, त्यावर संजय राजाराम राऊत सातत्याने टीका करत असून विनाकारण बदनामी करत आहेत. संविधानिक संस्थांवर विनाकारण टीका केली जात आहे. मोदींना आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुमान मिळत असताना हे पाहवत नसल्याने नमकहाराम देशद्रोही संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहे. राऊत विचारतात संसद भवनाची देशाला गरज होती का ? मग मी विचारतो एक मातोश्री असताना महापालिकेत भ्रष्टाचार करून बांधलेल्या दुसऱ्या मातोश्रीची काय गरज होती ?"
"अडीच वर्षात दुसरी मातोश्री बांधली पण स्वतःच्या वडिलांचं स्मारक बांधू शकला नाही. हा शकुनीमामा आहे. इतरांच्या घरात काड्या लावण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. अजित पवार, जयंत पाटील यांच्यात काड्या लावण्याचे धंदे संजय राऊत करत आहे. स्वतःच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ईशान्य मुंबई लोकसभा राऊतांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढायची आहे. सुधीर पाटणकर वर देखील कारवाई झालीच होती, त्या कारवाईचं पुढं काय झालं? कारवाईला घाबरून पाटणकर ऑस्ट्रेलियला गेले होते असे म्हणतात, मग पाटणकरपण भाजपात येणार असं बोलणार का? त्यावरही अग्रलेख लिही. विनाकारण भाजपवर टीका करू नका. तू नवाब मलिकांचे समर्थन करतोस. तुझा मालक सचिन वाझेला मांडीवर घेऊन का फिरत होता? तुझ्या मालकाचा मुलगा आणि भाचा वाझे सोबत लंडनला का गेले होते ? कुणाच्या घरी गेले होते? हे फोटोसकट माझ्याकडे आहे." असा गौप्यस्फोट राणेंनी केला.