मुंबई : बॉलीवूड स्टार आमिर खान हा 'महाभारत'वर भव्य असा चित्रपट बनवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गेले काही वर्ष होत होती. मात्र आता 'सध्या महाभारतवर काहीही चित्रपट किंवा वेब सिरीज बनवावी असे वातावरण नाही.' असे सांगत त्याने महाभारतच्या सर्व योजनांना ब्रेक लावला असल्याचे सांगण्यात येत आहे.
अभिनेता आमिर खान मागील ५-६ वर्षांपासून 'महाभारता'वर एक भव्य चित्रपट बनवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र मागच्या वर्षी आमिर हा प्रोजेक्ट मोठ्या पडद्यासाठी नव्हे तर ओटीटीवर प्रदर्शित करण्याची तयारी करत असल्याचे म्हटले गेले होते. मात्र आता संपूर्ण प्रकल्पच थांबवण्यात आला आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सर्व चांगल्या आणि वाईट बाबींचा विचार केल्यावर आमिर खानने 'महाभारत' हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट वादग्रस्त ठरु शकतो. इतकेच नाही तर ज्या मोठ्या प्रमाणावर हा चित्रपट बनवण्याची योजना आखली जात होती ती व्यावसायिकदृष्ट्या व्यवहारिक नव्हती. एका चित्रपटाला जास्त २ वर्षांहून अधिक काळ म्हणजे नुकसानदायक आहे. त्यामुळे आमिरने हा चित्रपट डबाबंद करण्याचा निर्णय घेतला आहे.