परभणी : देश व राज्याची प्रगती ही तेव्हा होईल जेव्हा सर्व सामान्य माणसाची विकासाच्या दिशेने वाटचाल झालेली असेल सर्वसामान्यांचा विकास हे ध्येय ठेऊन बँका व पतसंस्थांनी योगदान द्यावे असे प्रतिपादन महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या भव्य नवीन इमारतीचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते काल झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार मोहन फड, पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल आष्टूरकर, मधूकरदाजी जाधव आदि उपस्थित होते.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी व त्यांची पत निर्माण व्हावी यासाठी पतसंस्थेने काम केले पाहिजे. छोटे छोट उद्योग सुरु करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतानाच त्यांच्या वाढीमध्ये योगदान देताना सुरुवातीला त्यांच्या आर्थिक पात्रतेचा निकष व्यवहारीक पातळीवर पाहिला पाहिजे. त्यांच्याकडे या दृष्टीने आवश्यक पुरावे नसल्याने त्यांना बँकाकडून आर्थिक पाठबळ मिळण्यात अडचण येत असते. ही बाब हेरुन पतसंस्थांनी त्यांना सक्षम करावे असे पाटील यावेळी म्हणाले. जनकल्याण पतसंस्थेने जनतेच्या विश्वासाच्या बळावर मोठी भरारी घेतली असून याचा फायदा या भागातील जनतेला होईल असे पाटील यांनी सांगितले.