इव्हीएमविरोधात आंदोलन म्हणजे घटनेला विरोध : केशव उपाध्ये
08-Dec-2024
Total Views | 39
मुंबई : “इव्हीएम ( EVM ) मशीनविरोधात आंदोलन करणे, हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला विरोध आहे. जनतेने विचार करून महायुतीला निवडून दिले आहे. त्यांना तुम्ही एवढे अडाणी कसे समजू शकता?” असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांना केला आहे. शनिवार, ७ डिसेंबर रोजी आपल्या ’एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
केशव उपाध्ये म्हणाले की, “मारकडवाडी सध्या बरीच चर्चेत आहे. शरद पवार गटाच्या पुढाकाराने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे थोतांड करण्यात आले. याचे कौतुक नेहमीच भाजप-मोदी-फडणवीस द्वेषाच्या तमाशात तुणतुणे वाजवणारे संजय राऊत आणि अर्बन नक्षलींनी केले आहे. आता शरद पवार आणि राहुल गांधी येथे भेट देऊन परत मागणी करणार आहेत. परंतु, असा कोणताही प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेच्या विरोधात असून घटनेचा हा अपमान आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना प्रत्येक संस्थेला काही जबाबदार्या निश्चित केल्या आहेत. निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचेच काम आहे. उद्या मला निकाल मान्य नाही, म्हणून कुणी न्यायालय वेगळे सुरू करेल, कोणी अजून वेगळे प्रकार करेल. इव्हीएम निकाल तेव्हाच अमान्य होतो, जेव्हा भाजप जिंकते. लातूर शहरात अमित देशमुख जिंकले, तर इव्हीएमची तक्रार नाही. मात्र, लातूर ग्रामीणमध्ये त्यांचे बंधू हरले आणि भाजप जिंकले, तर इव्हीएममध्ये घोळ असतो. असला भंपकपणा जनता ओळखून आहे. म्हणूनच विरोधकांना ती महत्त्व देत नाही,” असे त्यांनी सांगितले.
दोष तुमच्या मानसिकतेत आणि विचारधारेत
केशव उपाध्ये म्हणाले की, “परवा मारकडवाडी येथे झालेल्या बॅलेट पेपरवर निवडणूक होणार, या नाटकाची कल्पनाही तिथल्या ग्रामस्थांना नव्हती. मुलाखतीत तसे सगळ्यांनी स्पष्ट सांगितले. म्हणजे महाविकास आघाडीचे नेते ग्रामस्थांना पुढे करून स्वतःच कुठेतरी शिक्के मारत बसणार आणि इव्हीएम कसे खोटे आहे, हे सिद्ध करणार. जनतेला तुम्ही एवढे अडाणी कसे समजू शकता? याच जनतेने विचार करून, ठरवून महायुतीला निवडून दिले आहे. अनेक वेळा संधी देऊनही विरोधकांना इव्हीएमविरोधात पुरावासुद्धां देता आला नाही, कारण मुळात दोष तुमच्या मानसिकतेत आणि विचारधारेत आहे,” अशी टीकाही उपाध्येंनी केली.