विधानसभेत काँग्रेस गटनेत्याची खुर्ची रिकामीच!

इच्छुकांच्या गर्दीमुळे निर्णय होईना; पटोले, वडेट्टीवार, नितीन राऊत, अमित देशमुखांकडून लॉबिंग

    17-Dec-2024
Total Views | 43
Congress

नागपूर : तब्बल ६० वर्षे देशात आणि राज्यात सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसचा यंदाच्या विधानसभा ( Vidhansabha ) निवडणुकीत मतदारांनी सुपडा साफ केला. तरीही सत्तापदे उपभोगण्याची त्यांची मनीषा कमी होताना दिसत नाही. विधानसभेच्या गटनेतेपदावरून या पक्षात प्रचंड धुसफूस सुरू असून, हिवाळी अधिवेशन सुरू झाले तरी अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे विशेष अधिवेशनाप्रमाणे या अधिवेशनातही काँग्रेस गटनेत्याची खुर्ची रिकामीच राहणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीत तब्बल १०३ जागा लढवणार्‍या काँग्रेसला केवळ १६ जागांवर विजय मिळाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यामुळे दुसर्‍या फळीतील काँग्रेस नेते मात्र हर्षोल्हासित झाले. वरिष्ठ नेते पराभूत झाल्यामुळे आता मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी त्यांची वाट अडवली. पटोलेंनी तर विधानसभेतील गटनेतेपदासाठी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवल्याचे कळते.
 
दुसरीकडे माजी मंत्री नितीन राऊत यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामार्फत काँग्रेस गटनेतेपदासाठी लॉबिंग सुरू केली आहे. तर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख हेही या पदासाठी इच्छुक आहेत. त्याच त्या नेत्यांना पुनःपुन्हा संधी दिली जात असल्यामुळे काँग्रेसमध्ये युवा नेतृत्व तयार होत नसल्याची खंत त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे.

पद एक आणि इच्छुक अनेक असल्यामुळे डावललेल्यांपैकी काहींनी वेगळा निर्णय घेतल्यास पक्षफुटीचा धोका संभवतो. अशा नाजूक स्थितीत नेमका काय निर्णय घ्यावा, असा पेच हायकमांडसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळेच या पदाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती काँग्रेसमधील अंतर्गत सूत्रांनी दिली.

आपलेच दात, आपलेच ओठ

संख्याबळ नसतानाही महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून विरोधीपक्ष नेतेपदासाठी आग्रह धरला जात आहे. भाजपने औदार्य दाखवल्यास हे पद आपल्यालाच मिळावे, यासाठी विशेषतः काँग्रेस आणि उबाठा गटातील नेते सक्रिय झाले आहेत.
नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी गटनेतेपदासाठी हट्ट धरण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे. तिकडे उबाठा गटाचे आ. भास्कर जाधव हेही बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात जाधव यांनी भाजप नेत्यांवर केलेल्या निलंबनाच्या कारवाईची आठवण करून देत काँग्रेसकडून उबाठाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121