घ्या! काँग्रेस आमदारानंच झापलं म्हणाला, "राऊतांच्या अंगात आलेलं कधी उतरलंच नाही!"
13-Nov-2024
Total Views | 196
सांगली : (Vishwajeet Kadam) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सध्या राज्यात प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. अशातच महाविकास आघाडीतील एका नेत्याने केलेल्या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं, पण राऊतांच्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं”, असे विधान माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.
माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजित कदम हे सांगलीच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नुकतंच विश्वजित कदम यांनी सांगलीच्या कडेगाव तालुक्यात एक प्रचारसभा आयोजित केली होती. यामध्ये त्यांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांच्यावर वक्तव्य केले.
विश्वजित कदम काय बोलले?
"२०१९ ला सरकार येईल असं वाटतंच नव्हतं. पण २०१९ ला महाविकास आघाडीचं सरकार बनलं. मी विनोदाने बऱ्याचदा म्हणतो की, संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं. पण, अडचण एवढी झाली की, अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं", असा टोला आमदार विश्वजित कदमांनी लगावला आहे.