मुंबई : “२०१९ साली भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी जनादेशाशी गद्दारी केली नसती, तर आजचे चित्र दिसले नसते,” असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले आहे. मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी ते कणकवली दौर्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. याप्रसंगी नितेश राणेदेखील उपस्थित होते. विनोद तावडे ( Vinod Tawade ) म्हणाले की, “२०१९ साली भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळाले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी जनादेशाशी गद्दारी केली नसती, तर आजचे चित्र दिसले नसते. बाळासाहेब ठाकरे असते, तर असे कधीच झाले नसते. एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची साथ कशी सोडली, याचे आजसुद्धा मला कोडे आहे,” असे त्यांनी सांगितले.