मुंबई : छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समितीने धनगड जातीतील सहा बोगस दाखले केले रद्द केल्याने धनगर आरक्षणातील अडथळा दूर झाला आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच धनगर आरक्षणाच्या लढाईत आपण टप्प्याटप्प्याने विजयाकडे जात असल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. राज्यात धनगड अस्तित्वात नसल्याचे सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले होते, मात्र, संभाजीनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब खिलारे, रमेश खिलारे, कैलास खिलारे, मंगल खिलारे, सुभाष खिलारे आणि सुशील खिलारे यांनी धनगडाचे खोटे दाखले काढले होते."
हे वाचलंत का? - नागपूरमध्ये पेरनोड रिकार्ड इंडियाची मोठी गुंतवणूक! ९० हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ
"जात पडताळणी समितीने एकदा एखाद्याला दिलेला दाखला रद्द करण्याचा अधिकार जात पडताळणी समितीला नव्हता, तो अधिकार जात पडताळणी समितीला देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने जात पडताळणी समितीने या बोगस दाखल्यांवर तात्काळ कारवाई केली आणि धनगडाचे सहा दाखले रद्द केले आहेत," असे त्यांनी सांगितले.