मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून १० जानेवारीपासून सुरु झालेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवन चरित्र स्पर्धेची १७ जानेवारी रोजी सांगता झाली. आज पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. मुंबईतील ११४८ शाळांमध्ये हि स्पर्धा घेतली घेली. ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक होती आणि यामध्ये १ लाख २० हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
या स्पर्धेमध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्य लेखन स्पर्धा आणि नाट्य स्पर्धा घेतली गेली. स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन आणि निवडक नाटकांचे सादरीकरण बक्षीस वितरण कार्यक्रमात पहायला मिळाले. प्रसंगी बोलताना मंत्री लोढा म्हणाले "प्रभू श्रीरामांच्या येण्याने संपूर्ण भारत राममय झाला आहे. त्यामुळे चित्रकला स्पर्धेतील ७० हजार चित्रे हे शाळा व जवळपासच्या मंदिरात लावण्याचे सांगितले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांच्या चरित्राचे संस्कार मुलांच्या मनावर झाले, याचा मला आनंद आहे. माझ्यासाठी हेच या स्पर्धेचे यश आहे!"
या कार्यक्रमाला स्थानिक आमदार श्री पराग आळवणी, प्रमूख पाहुणे म्हणून पद्मश्री रमेश पतंगे, ज्येष्ठ गायक आणि संगीतकार श्रीधर फडके, मुंबई महानगरपालिका उपायुक्त चंदा जाधव, म. न. पा. शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ हे उपस्थित होते.