खानिवडे: वसईत गुरुवारी पहाटे पासून दमदार हजेरी लावलेल्या पावसाने करपणाऱ्या भातपिकांना जीवदान दिले असून हा पाऊस हळव्या पिकांना संजीवनी ठरला आहे. यामुळे आकाशात डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोकुळ अष्टमी च्या दिवसात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी वरूण राजाचे आभार मानले आहेत.
यंदा जून महिन्यात सुरूवात करून लागून राहिलेल्या पावसाने जुलैला महिनाभर जोरदार वृष्टी करून सगळीकडे पाणीच पाणी केले असताना ऑगस्ट महिन्यात एखादं दुसरी सर सोडून सप्टेंबर चा पहिला आठवडा सरत आला तरी हुलकावणीच दिली होती. याचा परिणाम पालघर जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या भात शेतीला जाणवू लागला होता. हळव्या जमिनी पावसा अभावी सुकू लागल्याने त्यांना भेगा पडू लागल्या होत्या.
भात शेती संकटात सापडल्याने येथील शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागली होती. तर ज्या शेताजवळ पाण्याचे स्रोत आहेत तेथील शेतकऱ्यांनी इंजिन लावून पाणी देत हळवे भात पीक वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. यात अजून जर पावसाने विलंब केला असता तर नीम गरवी व गरवी पिके संकटात सापडली असती. मात्र गुरुवारी पहाटे पासून दमदार हजेरी लावलेल्या पावसामुळे भात पिकांना जीवदान मिळाले आहे. तर पाऊस नसल्याने वाढलेल्या उष्म्याने पाऊस येताच हवेत जो गारवा निर्माण केला आहे त्यामुळे नागरिकांना ही गर्मी पासून दिलासा मिळाला आहे.