ठाणे : जलशक्ती मंत्रालयाच्याअंतर्गत असलेल्या केंद्रीय भूजल मंडळाच्या शास्त्रज्ञांनी ठाणे जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती, जमिनीखालील खडक, भूजलाची स्थिती, जलधर नकाशा व भूजल पातळी वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची समावेश असलेला अहवाल तयार केला असून हा अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्याकडे सोपविला आहे. जिल्ह्यात भूजल पातळी घटल्याने भूजल व्यवस्थापनाशी संबंधित जलसंपदा, पाटबंधारे, जलसंधारण, कृषि आदी विभागांना या अहवालात सुचविलेल्या उपाययोजनांवर काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय भूज बोर्डाचे वैज्ञानिक व प्रभारी अधिकारी डॉ.जे. दाविथुराज, वैज्ञानिक संदीप वाघमारे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे ठाणे येथील वरिष्ठ वैज्ञानिक मृणालिनी लोखंडे आदी उपस्थित होते.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जलधर नकाशे तयार करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील भूजल पातळी, भूस्तराची स्थिती आदींचा अभ्यास यामध्ये करण्यात आला आहे. यंदा जिल्ह्याच्या सात तालुक्याचा समावेश जलधर नकाशामध्ये करण्यात आला आहे. भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक आराखडा तयार करून तो जिल्ह्यात राबविण्याची सूचना यामध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी भूजल व्यवस्थापन आराखडाही सुचविण्यात आला आहे.
उपाययोजनाबाबत सखोल अभ्यास
केंद्रीय भूजल बोर्डाने केलेल्या या आराखड्यामध्ये पर्जन्यमान, जलधर प्रणालीचे प्रकार व वैशिष्ट्ये, सिंचन व नकदी पिकासाठी भूजल उपशाचा भूजलावर येणार ताण, मर्यादीत भूजल उपलब्धता, भूजल पातळीतली चढउतार, भूजल गुणवत्ता, जिल्ह्यातील भूगर्भस्थिती, माती व जमिनीचा वापर यांचा अभ्यास करून अहवालामध्ये समावेश करण्यात आला आहे. या अहवालात सुचविलेला आराखडा राबवित असताना भूजलावर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेणे गरजेचे आहे. जेणेकरून जिल्ह्याचा भूजलावर आधारित शाश्वत विकास साधता येईल, असे या अहवालात नमूद केले आहे.
अहवालातील वैशिष्ट्ये व उपाय
- जिल्ह्यातील ४ हजार ९१ वर्ग किलोमीटर भौगोलिक क्षेत्रापैकी २ हजार १०६ वर्ग किलोमीटर क्षेत्र हे पहाडी क्षेत्र आणि बसाल्ट खडकाने व्यापलेले असुन जिल्ह्याच्या पाणी पातळीत घट आढळून आली आहे.
- झीज झालेल्या खडकांची जाडी ५ ते १८ मीटर आढळून आली
- जिल्ह्यात भूजल विकासाची स्थिती सरासरी १९ टक्के असल्याने ठिबक सिंचन पद्धती अवलंबवा
- ११,४३० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी ४ हजार ३०४ विहिरी व ७१९ विंधन विहिरी खोदाव्यात
- कमी जल उत्पादकात असलेले जलधर आढळून येत आहेत.
- जेथे पाण्याची पातळी खोलावर गेली आहे अशा क्षेत्रासाठी समतल बांध (कंटूर स्ट्रिंचिंग), नाला बंडिंग, गल्ली प्लगिंग यासारख्या कामे सुचविण्यात आली आहेत.