जयंतरावांच्या निधनाची धक्कादायक बातमी ऐकली आणि त्यांच्या सोबतचे प्रसंग आणि आठवणी मनासमोर उभ्या राहिल्या. १९९३-९४ मध्ये काही वेळ नाशिक विभाग प्रचारक, नंतर कोकण प्रांत प्रचारक आणि अन्य वेळी प्रांत प्रचारक बैठकीत आणि संघ शिक्षा वर्ग आदी अन्य कार्यक्रमांतून सतत भेटी होतच असत. मुंबईत परळ विभाग प्रचारक असल्यापासून घराशीही जवळचा संबंध आला.
अनेकांनी जयंतरावांच्या स्वभावगुणांचे वर्णन केले आहे. सर्व स्तरावर सहजतेने व आपलेपणाने संवाद, कुठलाही विषय समजून घेण्याची मर्मग्राहकता, संघातल्या सर्व विषयांची पक्की बैठक आणि त्याचबरोबर संघातील सामान्य विषयांसोबत नवीन विषय, कल्पना, माणसे यांना समजण्याची, जोडण्याची हातोटी, थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची तयारी, अशा काही वैशिष्ट्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल.जयंतराव तत्कालीन सरकार्यवाह शेषाद्री यांच्यासोबत दि. ६ डिसेंबर, १९९२ नंतरच्या काळात काही महिने ’साहाय्यक’ या नात्याने प्रवास करीत होते. व्यक्तिगतरित्या सांगायचे, तर लासलगावच्या प्रवासात माझ्याकडून अनावधानाने घडणार्या त्रुटींबद्दल मृदू, पण निश्चित शब्दात करून दिलेली जाणीव, वडाळ्याच्या प्रवासात एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी पहिल्या भेटीत सर्वांशी संवाद साधणे आणि घराविषयी अचूक आकलन करणे, संघ शिक्षा वर्गातील काटेकोर नियोजन, याचा उल्लेख करता येईल.
गोव्यात त्यांनी विभाग प्रचारक म्हणून प्रभावी काम केले होते. त्यामुळे विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, राजकारणातील वरिष्ठ कार्यकर्ते या सर्वांच्याच मनात जयंतरावांविषयी असणारा आदरभाव आणि जिव्हाळा सतत जाणवत असे.एक प्रसंग फार विलक्षण आहे. मार्च १९९९च्या प्रतिनिधी सभेकरिता आमची कुर्ला टर्मिनसवरून रात्री गाडी होती. १२ जणांची तिकिटे माझ्याकडे होती. त्या दिवशी जयंतरावांकडे गिरगावात एक कार्यक्रम असल्याने आम्ही जेऊन रात्रीची गाडी पकडण्याचे ठरवले. एकूण वेळेची काही गडबड झाली आणि गिरगाव, छत्रपती शिवाजी टर्मिनस, कुर्ल्याला गाडी बदलून टिळकनगर करेपर्यंत गाडी सुटण्याची वेळ झाली. तेव्हा मोबाईल नसल्याने इतरांना संपर्कही करणे शक्य नव्हते. स्टेशनबाहेरूनच गाडी सुटल्याचे दिसले, एक रिक्षावाला म्हणाला, ”गोरखपूर पकडनी हैं क्या?” आणि क्षणाचाही विचार न करता, दोघे रिक्षात बसलो. तो आम्हाला पुढच्या सिग्नलपर्यंत घेऊन गेला, गाडी तिथे थांबली होती. तसेच उतरून सामानासकट धावत निघालो. कसेबसे डब्यात शिरलो.
रिक्षावालाही आमच्या मागे भाड्याकरिता धावत होता. त्याला पैसे दिले आणि आत गेलो. नशिबाने अन्य कार्यकर्तेही तिकीट जवळ नसताना या गाडीत चढले होते. ईश्वरीय कार्य असे दोघांच्याही मनात आले. जयंतरावही हा प्रसंग अन्य कार्यकर्त्यांना नंतर सांगत.संघाच्या प्रांताच्या दायित्वानंतर आलेली ’विज्ञान भारती’ची जबाबदारी त्यांनी लिलया पेलली आणि आपल्या कार्यकुशलतेने त्यावर एक अमिट ठसा उमटविला. ‘बीएस्सी टेक’चे शिक्षण आणि विज्ञानाची अंगभूत गोडी याच्या जोडीला अथक परिश्रम आणि संघटनकौशल्य यांच्या आधारे त्यांनी अनेक कार्यक्रम अखिल भारतीय स्तरावर यशस्वीपणे पार पडले. त्याचबरोबर आपल्या प्रतिभेने या विषयात अनेक नवीन वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची भर घातली.
’शास्त्र प्रतिभा’ अथवा ‘सायन्स इंडिया फोरम’ या नावाने संयुक्त अरब अमिराती, कुवेतसारख्या आखाती देशांमध्ये हजारो भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारा कार्यक्रम असो किंवा ‘GIST - A Global Indian Scientist and Technocrat Forum’च्या माध्यमातून अमेरिका, युरोप आदी देशांतील प्रतिभावान शास्त्रज्ञांना भारताशी जोडण्याचा उपक्रम असो, असे उपक्रम यशस्वीपणे राबविताना कार्यकर्ते निर्माण करण्याची ही अद्भुत कला त्यांच्याकडे होती. या दोन्ही क्षेत्रातील कार्यकर्ते त्याची आजही आवर्जून आठवण काढतात.एका अर्थाने अपघातानंतरच त्यांना बिछान्यावर असलेले पाहिले. आज मला जयंतरावांनी भेटायचे आहे, त्यांना काही सांगायचे, विचारायचे आहे, असे म्हणत त्यांच्या प्रवासाची वाट पाहणारे अनेक जण डोळ्यासमोर आहेत. आपणा सर्वांनाच आता त्यांच्या स्मृतीतून प्रेरणा घेऊन पुढील मार्गक्रमण करावे लागेल. जयंतरावांच्या पुण्यस्मृतीस विनम्र श्रद्धांजली.
अनिल वर्तक
(लेखक विश्व विभाग सहसंयोजक आहेत.)