आजचा दिवस कोविडकाळात निष्पाप बळी गेलेल्या मुंबईकरांसाठी महत्त्वाचा होता. कारण आज एकीकडे बॉडीबॅग खरेदी घोटाळ्यासंबधी किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी झाली. तर दुसरीकडे ऑक्सिजन घोटाळ्यातील आरोपीविरुद्ध तक्रार दाखल झाली.त्यामुळे आज मुंबईकरांचा ऑक्सिजन घोटाळ्याने कसा जीव घेतला? बॉडीबॅग खरेदीत घोटाळा कसा झाला? त्यात आतापर्यत कोणाची नावे उघडकीस आले आहेत. ह्यामागे मास्टरमाईंड कोण आहे? अशा सर्व प्रश्नाची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
विषयाची सुरुवात करताना आपण आधी आतापर्यत ऑक्सिजन घोटाळ्यात आणि बॉडीबॅग खरेदी घोटाळ्यात काय घडलं? ह्याचा आढावा घेऊ? कोविड काळात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोपामुळे दि. ५ ऑगस्ट रोजी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कलम ४२० आणि कलम १२० ब या दोन कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आज ईडीकडून किशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यावेळी किशोरीताई म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारी संस्थांना कायम सहकार्य केलं पाहिजे.मी मुंबईकरांसाठी चांगलंच काम केलं आहे. त्यामुळे अशा चौकशांना सामोरं जाणं माझं काम आहे. खिचडी घोटाळ्याशी माझा संबंध नाही, असे ही किशोरीताई म्हणाल्या. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना विचारलं की, मग ठाकरे गटाच्या नेत्यांना उगाच कोविड घोटाळ्याच्या प्रकरणात गोवलं जातयं, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्यावर गोंधळून जात किशोरीताई म्हणाल्या की, नाही सगळ्यांना उगाच कोविड घोटाळ्यात गोवलं जात नाही! , असे किशोरीताई म्हणाल्या. म्हणजे कोविड घोटाळ्यात सगळे आरोपी नाहीत. तर काहीच आरोपी आहेत , असे त्य़ांना म्हणायचे होते का? असा प्रश्न निर्माण होतो.
दरम्यान दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेत कोविड काळात झालेल्या ऑक्सीजन घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय रोमिल छेडा यांच्यावर आणि त्यांच्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ह्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला ठाकरेंच्या सत्ताकाळात पेंग्विन आणण्यापासून ते आतापर्यंत ५३ कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच कोविड काळात रोमिल छेडांना काँन्ट्रक देताना मंत्री अस्लम शेख यांनी त्या कंपनीला ऑक्सिजन प्लांट संदर्भात काम देण्यासाठी विरोध केला होता. पण तरीही आपले हितसंबध जपण्यासाठी आदित्य ठाकरेंनी त्या कंपनीला काम मिळवून दिले. पंरतु आश्चर्यांची बाब म्हणजे रोमिल छेडा ह्यांच्या कंपनीला मुंबई महानगरपालिकेने आणि जयपूर हॉस्पिटलच्या राजस्थान सरकारने ही ब्लॅक लिस्ट केलं होत. कंपनीच्या माध्यमातून रोमिल छेडा यांनी १३८ कोटींचा ऑक्सिजन प्लांट पुरवठा करण्याचे पैसे घेतले आणि फक्त ३८ कोटी किंमतीचा ऑक्सिजन प्लांट पुरवठा केला.मग १०२ कोटी गेले कुठे? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. या संदर्भात केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी सुरु केली. आणि अखेर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
पण ह्यासगळ्यात रोमिल छेडा कोण आहेत असा प्रश्न वारंवार विचारला जातो. रोमिल छेडा हे एक कंत्राटदार आहेत. कोविड केंद्रांना खुर्च्या, पलंग आणि इतर वस्तू त्यांनी कोविड काळात पुरवल्या होत्या. पण ह्या वस्तु पुरवताना त्यांनी कोट्यवधी रुपयांची फुगलेली बिले सादर केली , असा आरोप ईडीच्या छापेमारीतून समोर आला आहे. दरम्यान कंत्राटदार राहुल गोम्स यांना ही कोविड जंबो केंद्रे बांधण्यासाठी बीएमसीने १५० कोटी रुपये दिले होते, असे ईडीने माहिती दिली आहे. त्याचबरोबर ईडीच्या छापेमारीत अनेक आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.तसेच उद्धव ठाकरेंच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात बोगस कंपन्यांना ऑक्सिजन प्लांटचे कॉन्ट्रॅक्ट् दिले होते. त्यावेळी ज्या बोगस मशिन लावण्यात आल्या त्या वेळेवर सुरु झाल्या नाहीत. ज्यावेळी ऑक्सिजनची गरज होती त्याच्या एक वर्षानंतर हे प्लांट सुरु झालेत. त्यामुळे या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यामुळे शेकडो कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. या सगळ्याची जबाबदारी उद्धव ठाकरे घेणार का?, असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे मागच्या २५ वर्षांपासून देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची सत्ता आहे. याकाळात महापालिकेत गैरव्यवहार होत असल्याचे अनेक आरोप करण्यात आले. मागच्या काही काळात या आरोपांमध्ये वाढ झाली. किंवा आपण असं म्हणू शकतो की मागच्या काही काळात महानगरपालिकेतील अनेक गैरव्यवहार समोर आलेत. मात्र त्यावेळी वेगवेगळे घोटाळे करत मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम काही लोकांकडून थाबलं नाही. ज्यातील अनेक घोटाळे आता उघडकीस येत आहे. बरं ठाकरे गटाचे नेते हे फक्त कोविड घोटाळ्यामुळे चर्चेला आलेत असे ही नाही. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब, खिचडी घोटाळा आणि बॉडीबॅग खरेदी प्रकरणी किशोरी पेडणेकर, भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर अशा ठाकरे गटातील नेत्यांची नावे चर्चेत आहेत.