मुंबई : 'याकूबची कबर सजविण्यात यावी असे आदेश थेट दुबईतून आले होते आणि त्यामुळेच नवाब मलिकांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील त्या विरोधात कुठलीही कारवाई केली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण झाल्यामुळे याकूब मेमनसह त्याच्याशी संबंधित मंडळींचे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या संबंधाची चौकशी केली पाहिजे,' अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
कबरीसाठीचे आदेश थेट दुबईवरून !
तत्कालीन सरकारने मौन बाळगण्याचे कारण हेच की कबरीसाठीचे आदेश थेट दुबईवरून आले होते. त्यामुळे तक्रार येऊनही कारवाई न करणाऱ्या मविआच्या नेत्यांच्या आणि मेमनच्या संबंधांचा तपास झाला पाहिजे, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंची अळीमिळी गुपचिळी
'याकुबला फाशी दिल्यानंतर बडा कब्रस्तानच्या संचालकांना याकूब मेमनचा भाऊ टायगर मेमनने धमकीचे पत्र दिले होते. याबाबत संचालक मंडळींनी तत्कालीन अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना तक्रार देखील केली होती. मात्र त्याकडे मलिकांनी साफ दुर्लक्ष केले. इतकंच काय तर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री पद टिकविण्यासाठी या प्रकारावर अळीमिळी गुपचिळी हेच धोरण अवलंबिले होते.' असा टोलाही भातखळकरांनी लगावला आहे.