मुंबई: मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घागरगाव येथे, ४० प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या बसमध्ये इंदौर आणि पुण्याचे प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही बस महाराष्ट्र रोडवेजची असल्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले. खलघाट येथील संजय सेतू येथे हा अपघात झाला.
या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश दिले आहेत. तर भाजपचे नेते गिरिश महाजन यांना मध्य प्रदेशमध्ये पाठवण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गिरीश महाजन यांना तातडीने इंदूरला पाठवण्यात आले असून या बचाव मोहिमेसाठी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.