पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त परंपरेनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक श्री.विठ्ठल रुक्मीणीची पूजा करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सलग दुसऱ्या वर्षी पायी वारीला परवानगी नाकारली. यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र वारकऱ्यानी हा विरोध झुगारून पायी वारीसाठी निघावे असे आवाहन ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी केले होते. यानंतर कराडकरांना स्थानबद्ध करण्यात आले होते. यावादानंतर पुन्हा एकदा महापूजेवरून बंडातात्यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली. 'मुख्यमंत्र्यांची दांभिक पूजा पांडुरंग स्वीकारणार नाही !' असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना बंडातात्या कराडकर म्हणाले, "सर्व संतांच्या पालख्या पायी जाण्याची प्रथा मोडून काढायची. पालखीसोबत फक्त ५० वारकरी पायी चालू द्या, ही विनंतीही धुडकावून लावायची. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करायची; पताका, टाळ, चिपळी हिसकावून घ्यायची तरीही पांडुरंगाची महापूजा करण्याचा घाट कशासाठी? मुख्यमंत्र्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून विठ्ठलाच्या महापूजेला येऊ नये. संतांचा अनादर करून केलेली महापूजा पांडुरंगाला मान्य होणार नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी महापूजेला येण्याचे टाळावे. मुख्यमंत्र्यांची दांभिक पूजा पांडुरग स्वीकारणार नाही." मात्र हा सर्व विरोध डावलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक महापूजेसाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह रस्तेमार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले होते. सकाळी ९ वाजेपर्यंत ते पंढरपुरात दाखल होतील. या महापूजेसाठी मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबिय, मानाचे वारकरी दांम्पत्य, पुरोहित, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गाभाऱ्यात असतील. पंढरीतील स्थानिक अंदाजित १०० वारकरी व फडकऱ्यांना वाखरीला न जाऊ देता नगरप्रक्षिणा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते आणि इंदुबाई केशव कोलते या वर्ध्यातील दांपत्याला मुख्यमंत्र्यांसह विठूमाऊलीच्या पूजेचा मान मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ मानाच्या पालख्यांनाच पंढपुरात परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सलग दुसऱ्या वर्षी आषाढी यात्रेचा सोहळा प्रतिकात्मक साजरा होणार आहे. श्रीसंत ज्ञानेश्वर, श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखीसह विविध नऊ संतांच्या पालख्या ठिकठिकाणाहून सोमवारी सकाळी पंढरपूरकडे बसमधून निघाल्या होत्या. प्रत्येक पालखीसाठी दोन बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रत्येक बसमधून प्रत्येकी वीस या प्रमाणे चारशे मानकरी पादुकांच्यासह वाखरी येथे सोमवारी दुपारी ३च्या सुमारास पोहोचल्या.
श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पालखीसोबत आलेल्या सर्व वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या वतीने वाखरी पालखी तळावर मानकऱ्यांचे सत्कार केले जाणार असून नंतर सर्व चारशेजण टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत इसबावी येथील विसावा मंदिरापर्यंत चालत येतील. तेथून पुढे मात्र प्रत्येक पालखीसोबत आलेले दोन वारकरी चालत पंढरपूरातील त्यांच्या मठांमध्ये जातील. उर्वरित मानकरी बसमधून पंढरपुरातील आपआपल्या मुक्कामाच्या मठांमध्ये जातील. यावेळी भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शासनाचे सर्व नियम पाळूनच हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम? विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही कारण इतक्या सहज पणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही.
- निलेश राणे, भाजप नेते
संतांचा व भगव्या ध्वजाचा पदोपदी अपमान व अनादर होत असताना आपल्या हातून होत असलेली महापुजा पांडुरंगाला मान्य होणार नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी महापुजेला येण्याचे टाळावे, असे मत जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केले.मा. मुख्यमंत्री विचार करा, जे औरंगजेबाला जमलं नाही ते आपण ‘करून दाखवलं.
- गोपीचंद पडळकर, विधानपरिषद आमदार
जनतेचे जिणे हराम
मुख्यमंत्र्यांचे घरातून काम.
पावसाने मुंबईचा चक्का जाम
मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम
एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम
तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम
तुका म्हणे माझा
विठ्ठल झाकोळला...
वारकरी भक्तांना
बसवुनी घरी,
फोटोमध्ये झळकती
मुख्यमंत्री...
- केशव उपाध्ये, भाजप मुख्य प्रदेश प्रवक्ते