मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे भवितव्य ठरवणारी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा निवाव्द्नुकीचे निकाल समोर आले. यामध्ये महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांवर मात करत भाजपच्या समाधान आवताडे यांनी विजय मिळवला. मात्र, या पराभवावर प्रथम कोणतीही प्रतिक्रिया न देता सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ममता बॅनर्जीचे कौतूक करण्यास सुरुवात केली.
यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी 'दै. मुंबई तरुण भारत' आणि 'साप्ताहिक विवेक'च्या "पश्चिम बंगाल ते पंढरपूर : मराठी वेबपोर्टलवरील पहिली मॅरेथॉन महाचर्चा!" या कार्यक्रमात, "आयजीच्या जीवावर बायजी उदार! महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लक्ष हे राज्याव्यातिरिक्त इतरत्र आहे. याचाच परिणाम त्यांना पंढरपुरात भोगावा लागत आहे. त्यांनी या पराभवाचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे." असे म्हणत टीका केली आहे.
"संजय राऊत दीदींच्या विजयावर जल्लोष करतात. नाना पटोलेंचा पक्ष मातीत जात असताना तरी ते मोदींवर आणि भाजपवर बोलतात. हे म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार, आणि सासूच्या जीवावर जावी जसा सुभेदार' अशी यांची गत झाली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले आहे पंढरपूरच्या निवडणुकीच्या निमित्ताने, की महाविकास आघाडी सरकार म्हणून पूर्ण अपयशी झाले आहेत.
आज भाजपने आसाम, पाँडिचेरी टिकवल आहे, तर ३ जागांवरून ८०हुन अधिक जागांवर जाते. त्यामुळे भाजप हा एकार्थी विजयीच झाल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यामुळे आपल्याला आता कुठेच थारा नाही म्हणून भाजपविरोधीच पोटशूळ कुठे तरी बाहेर काढण्याचे काम महाविकास आघाडीचे नेते करताना दिसत आहेत." असे म्हणत प्रवीण दरेकरांनी महाविकास आघाडी नेत्यांचा समाचार घेतला.
पुढे दरेकर यांनी पंढरपूरच्या विजयाबद्दल सांगितले की, "भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने, एक जीवाने काम केले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्यापासून ते गावाच्या कार्यकर्त्यांपर्यंत 'आपल्याला जिंकायचं आहे' आणि महाविकास आघाडी सरकारबद्दल जनतेचा जो रोष राज्याच्या समोर आणायचा आहे, अशा विचारांनी पेटून सर्वांची हातभार लावला. कोणताही मानपान न बघता प्रशांत परिचारक, समाधान आवताडे यांनी कार्यकर्त्यांसोबत केलेल्या कामाचे हे सामादायिक यश आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही."