नाशिक : नाशिकमध्ये आयोजित ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. दि. ३ ते ५ डिसेंबर या काळात भरणार्या सारस्वतांच्या मेळाव्यास मात्र प्रेक्षकसंख्येचे आव्हान असणार आहे. दि. १ डिसेंबरपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू असून हवेत कमालीचा गारठा तसेच धुक्याची दाट चादर पसरल्याने प्रेक्षकसंख्येबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
आयोजकांनी मात्र तयारी पूर्ण झाल्याचा व पावसाच्या दृष्टीने सर्व नियोजन केल्याचा दावा केला आहे. तसेच, साहित्य रसिकांची उत्तम उपस्थिती राहणार असल्याचा विश्वास आयोजकांच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. दि. २ डिसेंबर रोजी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला आयोजित ‘माझ्या जीवीची आवडी’ या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांची उपस्थिती फारच कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे आजपासून साजर्या होणार्या या सारस्वतांच्या मेळाव्यास नेमका कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, साहित्य संमेलनस्थळी संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वच कार्यकर्ते कार्यरत असल्याचे दिसून आले.
भाजपच्या नाराजीवर छगन भुजबळांचा उतारा
नाशिकमधील ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नावावरून निर्माण झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी संमेलनावर बहिष्कार टाकल्यानंतर त्याची गंभीर दखल स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी घेतली. त्यामुळेच त्यांनी स्वतः महापौर सतीश कुलकर्णी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यामुळे आता भाजप नेते संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती भुजबळांनी दिली आहे. स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार आहेत. महापौर सतीश कुलकर्णी साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत.
भुजबळ म्हणाले की, “नाशिकमध्ये होणार्या साहित्य संमेलनास नाशिक महानगरपालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात आहे. संमेलनासाठी निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नाशिकचे साहित्य संमेलन आपणा सर्वांचे साहित्य संमेलन असून सर्वांच्या सहभागाशिवाय ते यशस्वी होणार नाही. त्यामुळे नाशिककर म्हणून संमेलन यशस्वी करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तसेच महापौर म्हणून संमेलनासाठी येणार्या सगळ्या पाहुण्यांचे स्वागत करावे लागणार आहे. त्यामुळे आपण या संमेलनात सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना केले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार असल्याचे भुजबळांना सांगितले. महापौर सतीश कुलकर्णी हे कार्यक्रमांत सहभागी राहणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ‘भुजबळ नॉलेज सिटी’ नाशिक येथील ‘कुसुमाग्रज नगरी’त होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असून संमेलनस्थळी सुरू असलेल्या कामांची स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांनी आज पाहणी केली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संमेलनाच्या नियोजनाबाबत माहिती दिली.
छगन भुजबळ म्हणाले की, “पाऊस सुरू झाला असला तरी आवश्यक ती खबरदारी आपण घेतलेली आहे. पावसामुळे कुठलाही व्यत्यय येणार नाही. यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच कार्यक्रमात कुठलेही बदल केले जाणार नाही. मुख्यमंडप पावसापासून पूर्ण संरक्षित होईल, या पद्धतीने उभारण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी कुठलीही अडचण येणार नाही.
केवळ जे कार्यक्रम आपण खुल्या व्यासपीठावर घेणार होतो ते कार्यक्रम इतर ठिकाणी हलविण्यात आले आहे. याठिकाणी पहिल्यापेक्षा अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच पाऊस सातत्याने सुरू राहिल्यास मंडपाच्या दोन्ही बाजूने चर खोदून पाणी जाण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, नाशिकमध्ये पाऊस थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसून येत नसून काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने संध्याकाळी पुन्हा जोरदार हजेरी लावली. तसेच शुक्रवारीही पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.
कार्यक्रमस्थळी करण्यात आलेले फेरनियोजन
बालसाहित्य मेळावा - मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या जागेत
कवी कट्टा - कॉलेज कॅन्टीन जागेत
नाशिकमध्ये पावसाची परिस्थिती असल्यामुळे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडी नियोजनात बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार शुक्रवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता कुसुमाग्रज निवासस्थान (टिळकवाडी) येथून ग्रंथदिंडीची सुरुवात होणार आहे. पुढे ग्रंथदिंडी महापौर बंगला, रेमंड सिग्नलला उजवीकडे वळणार, जुने ‘सीबीएस’ सिग्नल ओलांडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोडवरून नाशिक जिमखाना, सागरमल मोदी शाळा, सारडा कन्या शाळा, परशुराम सायखेडकर नाट्यगृहवरून सार्वजनिक वाचनालय येथे विसावा, त्यानंतर ग्रंथपालखी संमेलनस्थळी ‘कुसुमाग्रज नगरी’-‘भुजबळ नॉलेज सिटी’ येथे जाणार आहे.