मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेने दिली परवानगी
मुंबई: कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वांना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळणार आहे.
मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वाना सुविधा होईल असेही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाने हा निर्णय घेताना म्हटले आहे. विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.
सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते, त्यप्र्माने आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी खालीलप्रमाणे ही सेवा उपलब्ध असणार आहे.
कधी प्रवास करता येईल:
१. सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.
२. कधी प्रवास करता येणार नाही: म्हणजेच सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.
३. सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांत आवश्यक तो बदल करावा अशी विनंती देखील मुख्य सचिव यांनी माहिती देत म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एक फेब्रुवारीपासून सुरू करत असलेल्या लोकल सेवा ही संपूर्णपणे सुरू करा अशी मागणी केली आहे. आपण ज्या वेळा आखून दिलेले आहेत त्यामध्ये नागरिकांना समस्या होतील त्यामुळे पुढे योग्य विचार करून सरकारने निर्णय घ्यावा असे दरेकर यांनी म्हटले आहे. तसेच लोकल सेवा सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतल्यामुळे प्रवासी संघटना आणि प्रवासी यांना मोठा दिलासा मिळाला आहे .गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी संघटना सरकार दरबारी रेल्वे सुरू करा अशी मागणी करत होते. कोर्टात देखील गेले . लोकल सुरू होत नसल्याने त्यांनी आता आंदोलन करायचे ठरवले होते मात्र सरकारने आज निर्णय घेतल्याने आम्ही आनंदात आहोत असा उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.