देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, आठवलेंसह प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात
मुंबई: राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे. तर नव्याने सुरक्षा काही जणांना पुरवण्यात आली आहे. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळलेले दिसत आहे. राज्य सरकारकडून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाआहे. आणि यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे.
दरम्यान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे जीवलग आणि युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली. राज्य सरकारची कोरोना काळातील मोहीम असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ वरुन मुख्यमंत्र्यांना देशपांडे यांनी टोमणा मारला. "वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे माझे 'कुटुंब माझी जबाबदारी' हे वाक्य मुख्यमंत्र्यांनी एकदम गांभीर्यानी घेतलेले दिसतंय", असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले.
तसेच राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली. ते म्हणाले, "विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली असून सरकारचा हा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे व सुडाचे राजकारण आहे."