नवी दिल्ली : भारत सरकारने कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासाठी केंद्र सरकारने दोन देशांतून येणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला आरोग्य प्रमाणपत्र नसताना भारतात येण्यास बंदी घातली आहे. यासाठी सरकारने विमानतळावर कडक बंदोबस्त व देखरेख ठेवली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या देशांमध्ये इटली आणि दक्षिण कोरियाचा समावेश आहे. परंतु, चीन आणि जपानचा यामध्ये समावेश करण्यात आला नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, "इटली आणि दक्षिण कोरियाहून येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्यांच्या स्थानिक आरोग्य विभागाकडून कोरोना विषाणूमुक्त प्रमाणपत्र घ्यावे लागेल. त्यानंतरच त्यांना भारतात प्रवेश देण्यात येणार आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा भारतामध्ये होणाऱ्या प्रादुर्भावाचा विचार करता सरकारने ही पावले उचलली आहेत. यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने इटली आणि दक्षिण कोरिया सरकारला माहिती दिली आहे. तसेच, सरकारने जपानसह १२ देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळांवर स्क्रीनिंग अनिवार्य केले आहे.
आतापर्यंत जगभरामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची ९५,४११ हून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यापैकी २,२८५८५ मृत्यूमुखी पडले आहेत. चीनच्या वुहानमध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणूमुळे जगातील ६० हून अधिक देशांमधील लोकांना ही लागण झाली आहे. आतापर्यंत भारतात २९ कोरोना विषाणूची नोंद झाली आहे.