सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका भारतीय संघाला चांगलाच बसला
नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचे ३४८ धावांचे आव्हान पार करत न्यूझीलंडने विजय मिळवला. भारत आणि न्यूझीलंड यांच्या ३ एकदिवसीय मालिकेमध्ये आता भारत ० - १ असा पिछाडीवर आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकात ४ बाद ३४७ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने हे आव्हान ११ चेंडू राखून ४ विकेट्सच्या राखून पार केले. सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका भारतीय संघाला बसला असला तरी मुंबईकर श्रेयस अय्यरने आपले पहिले शतक झळकावले.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताची नवी सलामीवीर जोडी मुंबईकर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल हे स्वस्तात माघारी परतले. पृथ्वी शॉने २१ चेंडूत २० तर मयांक अग्रवालने ३१ चेंडूत ३२ धावा केल्या. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार विराट कोहलीने संयमी फलंदाजी करत डावाला आकार दिला. ६३ चेंडूत ५१ धावा करुन तो बाद झाला. कोहली-श्रेयस अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने के एल राहुलच्या साथीने खेळाची सूत्रे हाती घेतली. राहुलने ४ षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर राहुलने केदार जाधवच्या साथीने फटकेबाजी चालूच ठेवली. राहुलने ६४ चेंडूत ६ षटकार आणि ३ चौकार ठोकत नाबाद ८८ धावा केल्या. तर केदार जाधव १५ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह २६ धावांवर नाबाद राहिला.
भारताने उभे केलेले ३४८ धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. गोलंदाजणांची सुरुवातीला अचूक मारा करत काही काळ रंगवले खरे पण न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना डोके वर काढून दिले नाही. किवी फलंदाजांची फटकेबाजी चालू राहिली. न्यूझीलंडची अवस्था २० षटकांमध्ये २ बाद ११० अशी झाली होती. त्यानंतर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असेलल्या हेन्री निकोलसला विराट कोहलीने धावबाद केले. निकोलस बाद झाल्यानंतर रॉस टेलर आणि लॅथम यांनी डाव सावरला. दोघांनी १२९ धावांची भागिदारी करत संघाला विजयाच्या जाल घेऊन गेले. मात्र, लॅथम कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ४८ चेंडूत ६९ धावा केल्या. रॉस टेलरने ७३ चेंडूत शतक साजरे केले. शेवटच्या षटकांमध्ये न्यूझीलंडचे दोन फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, शतकवीर रॉस टेलर याने अखेरपर्यंत किल्ला लढवत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. ४८.१ षटकांत न्यूझीलंडने भारताचे ३४७ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. यावेळी भारताचे क्षेत्ररक्षण सुमार राहिले. अनेकदा हातातले झेल सोडत त्यांनी रॉस टेलरला जीवनदान दिले. त्यामुळे हा सामना भारताला गमवावा लागला.