उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी दिले खुले आव्हान
मुंबई : कांजूरमार्गला कारशेड नेले तरीही आरेमध्ये बांधकाम करावेच लागणार आहे, हे सरकार लपवत का आहे, असा प्रश्न आता भाजपतर्फे विचारला जात आहे. राज्यातील राजकारणात सध्या कांजूरमार्ग कारशेड प्रकरणामुळे चांगलीच गरमागरम चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्ग कारशेडचे फायदे वाचून दाखवल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या या मुद्द्यांची तासाभरात पोलखोल केली.
फडणवीसांनी केली हात जोडून विनंती
"बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ ८० टक्के पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार आहे. मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको.हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, अशी हात जोडून विनंती फडणवीसांनी सरकारला केली आहे.
कांजूरमार्गमध्ये कारशेड म्हणजे नुकसानच !
फडणवीस म्हणाले, "तीस मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय चार वर्षांचा विलंब होणार आहे. कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता?" आदी मुद्द्यांवरून फडणवीसांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत.
केंद्राचा निधीही महत्वाचा !
"मेट्रो प्रकल्पात राज्य सरकारइतकाच निधी केंद्र सरकारचा सुद्धा आहे.केंद्राच्या मदतीने JICAने या प्रकल्पाला वित्तपुरवठा केला आहे.मुंबईकरांच्या हितासाठी केंद्र सरकारने यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राला सहकार्य करण्याची भूमिका घेतली;यापुढेसुद्धा सहकार्याचीच भूमिका केंद्र सरकारची असेल! आरेची जागा अंतिम झाल्यानंतर काम सुद्धा बरेच पुढे गेले आणि शंभर 100 कोटी रुपयांचा खर्चही झाला.", अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
ठाकरे सरकारला खुले आव्हान
"लोकशाहीत चर्चेला आमची कायमच तयारी असते आणि चर्चेतून मार्गही निघतो.मनात शंका असेल तर आज आरे कारशेडला जी जागा दिली, त्यापेक्षा एक इंच जास्त जागा भविष्यात दिली जाणार नाही, असा निर्णय करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आमची एकच विनंती आहे की,आता दुराग्रह सोडून द्यावा आणि मुंबईकरांच्या हितासाठी आरेच्या जागेवर कारशेडचा मार्ग तत्काळ प्रशस्त करावा", असे आवाहन फडणवीसांनी केले आहे.