जळगाव : ज्या व्यक्तीने पक्ष भाजपसोबत युतीत असतानाच शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना राष्ट्रवादीत आणि महाविकास आघाडीत प्रवेश मिळाला हे ऐकून मला धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रीया मुक्ताईनगरचे शिवसेना-राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार चंद्रकात पाटील यांनी दिली आहे. याबद्दल स्वतः पक्षश्रेष्ठी आणि शरद पवार यांच्याशी बोलणार असल्याचेही ते म्हणाले. २०१४ मध्ये शिवसेना-भाजप युती तोडण्यामागे एकनाथ खडसे यांचा हात होता, असे पाटील म्हणाले.
मुक्ताईनगरमध्ये खडसेंना हस्तक्षेप करू देणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. शिवसैनिक हे खडसेंना स्वीकारणार नाहीत, असेही पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यातील मंत्रीमंडळात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकनाथ खडसे विधान परिषदेवर जाणार असून त्यांना मंत्रीपदही मिळणार आहेत. खडसे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील कृषीमंत्रीपद मिळणार अशी चर्चा आहे.
राष्ट्रवादीकडे असलेले गृहनिर्माण खाते हे शिवसेनेकडे जाणार असल्याचे समजते त्याऐवजी विद्यमान गृहमंत्री असलेले जितेंद्र आव्हाड यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षातर्फे दिली जाऊ शकते. खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे येत्या काळात राज्याच्या सरकारमध्ये विशेषतः महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होणार आहेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.