नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी वादाप्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला न्यायालयीन सुनावणीचा वनवास बुधवारी अखेर संपुष्टात आला. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी याप्रकरणी अखेरची सुनावणी पार पडली असून न्यायाधीशांनी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे. येत्या १७ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी आपला निकाल देणार आहे.
बुधवारी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ४०वी सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आणखी वेळ देण्यास ठाम नकार दर्शवला. बुधवारी सुनावणी सुरू होताच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले की, आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत या प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु, आजची सुनावणी वेळेच्या तासभर आधीच पूर्ण करण्यात आली, हे विशेष.
यावेळी सुनावणीत मुस्लीम आणि हिंदू पक्षकाराने आपापली बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली. सुनावणीदरम्यान हाय व्होल्टेज ड्रामासुद्धा पाहायला मिळाला. याआधी मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्व पक्षकारांना १६ ऑक्टोबरपर्यंत यासंबंधीचे पुरावे सादर करण्याचे निर्देश सरन्यायाधीशांनी दिले होते. या प्रकरणावर फैसला सुनावण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याने पक्षकारांनी बुधवारी आपापले पुरावे सादर करावे, असे सरन्यायाधीश यांनी आधीच नमूद केले होते.