विद्यार्थ्यांची वर्दळ असल्याने अपघाताचा धोका
शाळा, महाविद्यालये आवारातील खुल्या गटारी धोकादायक
जळगाव, ३० जुलै
मनपा निवडणूक अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. यामुळे भावी उमेदवारांसह कार्यकर्ते प्रचारात दंग आहेत. अशातच शहरातील शाळा, आणि महाविद्यालयाच्या आवारातील धोकादायक खुल्या गटारींकडे मनपाची डोळेझाक होत असल्याचे चित्र आहे.
मू.जे. महाविद्यालय, बेंडाळे, नूतन मराठा महाविद्यालय परिसरात सकाळी आणि दुपारच्या वेळेस विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यात काही विद्यार्थी दुचाकीने तर काही जण पायी जातात. त्यामुळे येथे बर्याचदा वाहतुकीची कोंडी होते. यातून मार्ग काढताना संभाव्य अपघाताला निमंत्रण मिळत असून मनपाने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया आवारातील व्यावसायिक तसेच रहिवाशांकडून उमटत आहे. रहदारीच्या ठिकाणी भल्या मोठ्या खुल्या गटारी असल्याने त्यातून दुर्गंधी येते. त्यामुळे अनेकांना तोंडाला रुमाल लावण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा गटारींवर मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढल्यामुळे गटारी असल्याचे दिसत नाही, यामुळेही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून त्या उघड्या राहिल्याने मनपातील संबंधितांकडे तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्षच झाले आहे. आता निवडणुकीचे वातावरण सुरु आहे. त्याचाही फटका अशा कामांना मिळाला आहे. दरम्यान उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
खुल्या गटारी देताहेत अपघातास निमंत्रण
शाळा आणि महाविद्यालयाच्या आवारातील खुल्या गटारींकडून जाताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून जावे लागते. चुकून एखाद्या दुचाकीस्वाराचा धक्का लागल्यास अपघाताचा धोका टाळता येत नाही. प्रशासन वेळीच जागे होऊन त्याचे कामे हाती घेतात. त्यामुळे खुल्या गटारींची कामे त्वरित मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.