नवी दिल्ली : “आपल्याच नागरिकांवर अत्याचार करणारा हिटलर आणि देशात आणीबाणी लागू करून आपल्याच नागरिकांचे अधिकार हिरावून त्यांना तुरुंगात डांबणार्या इंदिरा गांधी यांच्यात काहीच फरक नव्हता,” अशी टीका भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आज सोमवारी केली.
“आणीबाणीच्या काळात देशभरातच भीती आणि दहशतीचे वातावरण होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य राजकीय पक्षांचे नेते आणीबाणीला सातत्याने विरोध करीत होते आणि सत्याग्रह करीत होते,” असे जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटले आहे.
“इंदिरा गांधी यांनी मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करून देशावर आणीबाणी लादली होती. जर्मनीचा हुकूमशाह हिटलर हा देखील आपल्या नागरिकांवर अत्याचार करायचा. लोकशाहीला हुकूमशाहीत बदलण्यासाठी राज्यघटनेची पायमल्ली करायची, ही भूमिका हिटलरप्रमाणेच इंदिरा गांधी यांचीही होती. हिटलरने बहुतांश विरोधी पक्षनेत्यांना अटक करून आपले अल्पमतातील सरकार दोन तृतीयांश बहुमतात आणले होते,” असेही जेटली यांनी यात नमूद केले.
आणीबाणीतून एकच धडा मिळतो आणि तो म्हणजे, जेव्हा तुम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्य हिरावता आणि केवळ खोट्या प्रचाराला परवानगी देता, तेव्हा त्याचे पहिले शिकार तुम्हीच ठरत असता. यावेळी त्यांनी आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांच्या पंचसूत्री कार्यक्रमाचा भाग राहिलेल्या नसबंदीवरही टीका केली.