जळगाव :
अमृत योजनेच्या अंतर्गत जळगाव शहरात होणार असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार, ३० रोजी दुपारी २.३० ते ३ यावेळेत भाऊंचे उद्यानात होणार आहे.
शहरात १०० टक्के नळ संयोजनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जुनी वितरण व्यवस्था दुरुस्त करणे, पाणीचोरी रोखण्यासाठी नळ जोडण्या बदलणे, संगणकीय प्रणालीद्वारे पाणी वापराचे रीडिंग घेणे आदी उपाययोजना आवश्यक झाल्या आहेत. यासाठी अमृत योजना राबविली जात असून, १९१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात ४५० किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकणे, सात नवीन जलकुंभ उभारून साठवण क्षमता वाढविणे यासह इतर विविध कामे केली जाणार आहेत. हे काम जैन इरिगेशन कंपनीला मिळाले आहे. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी सभागृह नेते नितीन लढ्ढा, नगरसेवक अमर जैन व अधिकारी यांनी पाहणी केली.