जैन इरिगेशनतर्फे कीर्तनातून प्रबोधन
जळगाव :
संतांनी सत मार्गाने चालण्यासोबतच परोपकारी होण्याची शिकवण आपणास दिली आहे. संतांच्या ह्याच शिकवणीतून निसर्गाला बाधा होईल, असे मानवी वर्तनसुध्दा पाप असून निसर्ग संवर्धनातूनच परमार्थ साधता येतो, असे निरूपण धरणगाव तालुक्यातील तारडे येथे झालेल्या कीर्तनावेळी हभप ऋषिकेश जोशी यांनी केले.
जैन इरिगेशनतर्फे विविध सामाजिक विषयांवर कीर्तनातून प्रबोधन करण्यात येत आहे. सुमारे सातशे लोकवस्ती असलेल्या तारडे गावातील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात झालेल्या कीर्तनावेळी ग्रामस्थांनी उपस्थिती होती.
निसर्गाच्या संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या जैन इरिगेशनतर्फे कीर्तनातून स्त्री भ्रूणहत्या, बेटी बचाओ, बेटी पढाओ, पर्यावरणाचे महत्त्व, पाणी बचत, स्वच्छता आदी समाजोपयोगी विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे.
जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. तारडे येथे झालेल्या कीर्तनामध्ये जळगाव येथील हभप ऋषिकेश जोशी यांनी संत निळोबाराय महाराज यांचा संतांची या वाटे वाट चालो आता, क्रोध भय चिंता काही नाही हा अभंग निरूपणासाठी घेतला होता. संतांनी सांगितलेल्या सत्याच्या मार्गावर चालताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे पुरूषार्थ.
नदी प्रदुषित न होऊ देणे, वृक्षांची कत्तल न करणे जेणेकरून निसर्गाचे संवर्धन होईल, यासाठी परोपकार भावनेतून प्रत्येकाने आचरण केले पाहिजे.
घरच्या लक्ष्मीपासून सर्वच स्त्रियांचा आदर केला पाहिजे, असे सांगत वारकरी संप्रदायातील पर्यावरणाचे महत्त्व कीर्तनातून त्यांनी पटवून दिले. टाळकरी व वीणेवर विनोद जाधव, ललित सूर्यवंशी यांनी साथसंगत दिली. यावेळी भाविक उपस्थित होते. या मार्गदर्शनाने भाविक तल्लीन झाले होते.