मुंबई : “देशाची सर्वांगीण उन्नती, विकास आणि प्रगती करणे, हेच आमचे जीवनध्येय आहे. मी केवळ पद, प्रतिष्ठा, सन्मानासाठी मंत्री झालो नाही, तर राष्ट्राला पुढे नेण्यासाठी सरकारमध्ये बसलो आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी असून जगातील पहिल्या पाच देशांत भारताचा क्रमांक यावा, ही आमची इच्छा आहे. हे फार मोठे उद्दिष्ट असून ते कठीण वाटत असले तरी, अशक्य नाही. आम्ही त्याच दिशेने काम करत आहोत,” अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी आपल्या मंत्रालयाची व केंद्र सरकारची भूमिका विशद केली. २०१४ साली देशात सत्तेवर आल्यापासून नरेंद्र मोदी सरकारने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात रस्ते, रेल्वे, जलमार्ग, बंदरांच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला. इराणमधील चाबहार बंदर, बीबीआयएन, आशिया-आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर आणि मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्ग, मुंबईतून क्रूझ सेवा आदी प्रकल्प केंद्र सरकारच्या याच धोरणाचे भाग. याच निरनिराळ्या प्रकल्प व योजनांचा होणारा परिणाम, उपयोग व माहिती देणाऱ्या ‘रुट्स ऑफ प्रॉस्पेरिटी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुस्तक प्रकाशनसोहळ्याला विशेष अतिथी म्हणून ग्लोबल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रबोध ठक्कर उपस्थित होते. यावेळी मंचावर राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासाचे प्रमुख रवींद्र संघवी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार उपस्थित होते. राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यास यांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘रुट्स ऑफ प्रॉस्पेरिटी’ पुस्तकाचे संपादन चंद्रहास मिरासदार यांनी केले आहे. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये आणि आजच्या कार्यक्रमामध्ये स्मार्ट उद्योजक, लघु उद्योग भारती, नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट-महाराष्ट्र, वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम, फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी या संस्थादेखील सहाभागी झाल्या होत्या.
जगात भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढत असल्याचे सांगून नितीन गडकरी आपल्या मनोगतात म्हणाले की, “भारताला आठ लाख कोटी डॉलर्स दरवर्षी केवळ कच्च्या तेलाच्या आयातीवर खर्च करावे लागतात. पण आम्ही या आयातीला पर्याय देण्यासाठी स्वदेशीचा विचार करत आहोत. ज्यामध्ये इथेनॉल, जैवइंधन, इलेक्ट्रीक टेक्नॉलॉजीचा वापर करून वाहने चालवली जातील. यातून देशातील सर्वसामान्य शेतकऱ्याला फायदा होईल, रोजगार मिळेल. जैव इंधनाच्या निर्मितीसाठी पडिक जमिनीचा वापर करून तिथे जेट्रोफा आदी वनस्पतींची लागवड केली जाईल. जैव इंधनाच्या निर्मितीतून ३० हजार कोटींची बचत होईल आणि हे इंधन फक्त ५० रुपये प्रतिलीटर दराने उपलब्ध होईल. सध्या बोईंग, बम्बार्डियर या कंपन्यांनी १०० टक्के जैव इंधनावर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्याला मान्यता दिली आहे,” असे गडकरी यांनी स्पष्ट केले. नितीन गडकरींनी यावेळी केंद्र सरकार आणि आपल्या मंत्रालयाकडून सुरू झालेल्या व होऊ घातलेल्या अनेक प्रकल्पांची माहिती दिली. “भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नद्यांचे पाणी अडवून ते पंजाब, हरियाणा, राजस्थान व उत्तर प्रदेशपर्यंत आणणार, समुद्राचे पाणी शुद्ध करून पिण्यासाठी व शहरांतील अशुद्ध पाणी शुद्ध करून शेतीसाठी देणार, गंगेत अंतर्गत जलवाहतूक सुरू करणार,” असे त्यांनी सांगितले. “सोबतच गेल्या साडेचार वर्षांत देशाचा रस्ते बांधणीचा वेग वाढला असून, सध्या २८ किमी. रस्ते दररोज बांधले जात आहेत,” असे ते म्हणाले.
‘रुट्स ऑफ प्रॉस्पेरिटी’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दळणवणळ मार्गांची उभारणी करण्यात येत असून त्यामुळे भारताला नेमका काय फायदा होईल, हेही यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले. “बांगलादेश-भुतान-इंडिया-नेपाळ म्हणजेच बीबीआयएन प्रकल्पात आठ मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली जात असून हा तीन हजार ५०० किमीचा मार्ग आहे. भारत-म्यानमार-थायलंड या १ हजार ३६० किमी मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. मिझोराममधील कलादान नदीचा जलवाहतुकीसाठी वापर करण्यात येणार आहे. या सर्वच प्रकल्पांमुळे व्यापार, उद्योग व व्यवसायाला मोठा फायदा होईल,” असे गडकरींनी सांगितले. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या चिंतनाचा उल्लेख करून नितीन गडकरी म्हणाले की, “देशाची अर्थव्यवस्था पुढे नेणे हे आमचे उद्दिष्ट आहेच पण, त्यासोबतच गरिबी, उपासमार, कुपोषण या देशापुढच्या समस्या आहेत. श्रीमंत लोकांचा गरीब देश ही आपली सध्याची ओळख आहे. याला चुकीची आर्थिक धोरणे, भ्रष्टाचार आणि ध्येयहीन सरकारेच जबाबदार आहेत. पण आम्ही हे चित्र बदलण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे गडकरींनी स्पष्ट केले.
मुंबईला जलमार्गाने जोडणार
“मुंबई ते गोवा क्रूझ सेवा आमच्या सरकारने सुरू केली असून मुंबईला जलमार्गाने जोडण्याची आमची योजना आहे. येथील समुद्राचा उपयोग जलवाहतुकीसाठी करणार असून नवी मुंबई विमानतळापर्यंत वॉटर टॅक्सी सेवा देणार आहोत. मुंबईतील जलवाहतुकीमुळे अडीच लाख लोकांना रोजगार मिळेल. सोबतच हवेत चालणाऱ्या बसेस आम्ही आणणार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/