बीड सरपंच हत्येप्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुरक्षा पुरवण्याची मागणी

    06-Jan-2025
Total Views |
 
Sharad Pawar
 
मुंबई : राज्यभरात सध्या बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. दरम्यान, अशातच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहीले असून या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.
 
 
 
शरद पवार म्हणाले की, "बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते.
 
हे वाचलंत का? -  कोणत्याच निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, असंसुद्धा कायदा सांगतो!
 
बीड, परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे. त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे," अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.