प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट! "भाजपसोबत जाण्यास ठाकरेंनी..."
16-May-2024
Total Views |
मुंबई : भाजपसोबत न जाण्याच्या अटीला संजय राऊतांनी नकार दिला आणि आम्ही आमचे दरवाजे बंद करणार नाहीत, असे ते म्हणाले, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "महाविकास आघाडीसोबत जाताना आम्ही काही अटी टाकल्या होत्या. त्यात एक भाजपसोबत न जाण्याची अट होती. ही पचणारी अट नव्हती. त्यामुळे हा माणूस आणि पक्ष बाहेर गेलेला बरा असं त्यांना वाटलं आणि ते दोन जागा देण्यावर अडून बसले होते. हे सगळं सांगणारा संजय राऊत होता. त्यांनी स्वत:हून सांगितलं की, हे आम्ही लेखी देऊ शकणार नाही आणि आम्ही आमचे दरवाजे बंद करणार नाहीत. त्यांनी जाहीर मीटिंगमध्ये हे सांगितलं," असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतू, शेवटच्या क्षणापर्यंत या चर्चाच राहिल्या आणि जागावाटपावर एकमत न झाल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता लोकसभा निवडणूका अंतिम टप्प्यात आल्या असताना त्यांनी मविआमध्ये न जाण्याबाबत हा खुलासा केला आहे.