मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य अखेर तब्बल ६० तासांनंतर पूर्ण झाले असून मृतांच्या आकड्यात वाढ झाली आहे. या दुर्घटनेत एकुण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबद्दलची माहिती दिली.
भूषण गगराणी म्हणाले की, "घाटकोपर होर्डिंग दुर्घटनचे बचावकार्य समाप्त झाले असून १६ लोकांचा मृत्यू झाला आहे तर, ४२ लोक रुग्णालयात दाखल आहेत. इथला पेट्रोलपंप सुरु असल्याने याठिकाणी इंधन होतं. त्यामुळे बचावकार्यात अनेक मर्यादा होत्या. पण मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, एनडीआरएफ, मुंबई पोलिस आणि महानगर गॅस या सर्वांनी ताळमेळ ठेवत जबाबदारीने काम केल्याने आता बचावकार्य पूर्ण झालेलं आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व होर्डिंगची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ते म्हणाले, "सर्व होर्डिंग्सना स्ट्रक्चरल स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यांना आवश्यक स्थिरता देण्यासाठी आकार, पाया आणि वाऱ्याचा वेग या वैशिष्ट्यांचे पालन करावे लागेल," असेही ते म्हणाले.