मुंबई : श्रीरामदास स्वामी संस्थानचा सांप्रदायिक दासनवमी भिक्षा प्रचार दौरा मुंबई येथे सुरु असताना मुंबई विद्यापीठाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका मुग्धा धनंजय कर्णिक यांनी काही दिवसांपूर्वी प्रभु श्रीराम आणि समर्थ रामदासांबाबत आक्षेपार्ह मजकूर आपल्या फेसबूक पेजवरून पोस्ट केला आहे. यात शिव्यांचाही सर्रास वापर केला आहे. सदर मजकूरामुळे धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी समर्थ व्यासपीठचे समन्वयक सुहास क्षीरसागर यांच्यासह अन्य समर्थभक्तांनी मुग्धा कर्णिक यांच्याविरोधात दि. १२ फेब्रुवारी रोजी एफआयआर नोंदविला असून याप्रकरणी पोलिकांकडून उचित कारवाई व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
मुग्धा धनंजय कर्णिक यांनी आपल्या 'मुग्धा धनंजय' नामक फेसबूक पेजवर लिहिताना श्रीसमर्थ रामदास स्वामी, श्रीसंप्रदाय यांचा उल्लेख करत भीक्षा मागण्याच्या प्रक्रियेला भीक मागण्याचा प्रकार म्हणत त्यासंदर्भात आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. तसेच सज्जनगड संस्थानचाही उल्लेख करत संत रामदास, प्रभु श्रीराम आणि हिंदु धर्माविषयी शिव्या देत आक्षेपार्ह आणि बीभत्स पोस्ट समाज माध्यमावर प्रसारित करून हिंदु धर्माच्या श्रद्धेचा आणि भावनांच्या अपमान केल्याचे दिसत आहे. सदर प्रकरणी पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० - कलम २९५ ए व कलम ५०० अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
अशा प्रवृत्तीला आळा बसायलाच हवा!
ज्या संप्रदायास ३५० वर्षांची परंपरा आहे त्याची टिंगल करणे, त्याची अवहेलना करणे कितपत योग्य आहे? भिक्षा मागण्याची पद्धत सर्व संप्रदायांमध्ये दिसून येते. समाजाचे काम करणारी मंडळी समाजातूनच पैसा गोळा करून काम करत असतात. त्यामुळे भिक्षा मागण्यात गैर नाही. समाज माध्यमातून याची अवहेलना करणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसायलाच हवा. सदर पोस्ट ताबडतोब डिलिट झाली पाहिजे.
- सुहास क्षीरसागर, समन्वयक, समर्थ व्यासपीठ, पुणे
हा हिंदुंचा ठरवून केलेला अपमान!
अशा प्रवृत्तींना कायदेशीर मार्गाने धडा शिकवायलाच हवा. प्रभु श्रीराम हे आपले आराध्य दैवत आहेत.त्यांच्याविषयी अशी अश्लाघ्य भाषा वापरणं कुठल्याही सुजाण हिंदुला दुखावणारंच आहे. मतभेद व्यक्त करणं वेगळी गोष्ट असून हा हिंदुंचा ठरवून केलेला अपमान आहे. अशा पद्धतीने विकृत वागणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी.
- शेफाली वैद्य, लेखिका