मी घरात बसून केले ते तुम्हाला सुरतला बसूनही जमले नाही : उद्धव ठाकरे
15-Mar-2023
Total Views | 145
97
मुंबई : छत्रपती शिवजी महाराज आपली परीक्षा पाहत आहेत, आपण ज्यांचे नाव घेतो त्यांनी आपल्या मनगटातील ताकद आजमावण्यासाठी आपली परीक्षा घेतली आहे. दिल्लीतील सरकारांची तुलना उद्धव ठाकरेंनी अफझल खानाशी केली. एकतर तुरुंगात किंवा भाजपात, अशी टीका त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीतून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल चढवला. मी घरी बसून जे कमावलं ते तुम्हाला सुरतला जाऊनही करता आलं नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, "लोकशाहीच्या स्तंभाची विल्हेवाट लावली आहे. पत्रकारांच्या हातांमध्ये कलम असायला हवी, आजकाल बऱ्याच पत्रकारांच्या हातात कमल आहे. या सगळ्यात आशादायी किरण म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे. न्यायादेवताच्या डोळ्यासमोर पट्टी असली तरीही ती धृतराष्ट्रासमोर जे घडलं तशी पट्टी नाही. त्यामुळे न्यायदेवता लोकशाहीचे वस्त्रहरण करू देणार नाही." उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर महाविकास आघाडी म्हणून सभा घेणार आहेत.
"देशात लोकशाही संपविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. लोकशाही टीकवण्यासाठी सर्वसामान्य माणसांनीही यात उतरण्याची गरज आहे. आज अनेकजण मला विचारतात, काहो तुम्हाला आधी कळलं नव्हतं का? मी म्हणतो हो कळलं होतं. पण मी लढू कसा, जी विकली गेलेली माणसं आहेत, त्यांच्याशी मी लढू कसा, मला लढाऊ माणसं आहेत. मी सगळ्यांना ठणकावून सांगितलं होतं. ज्यांना रहायंचं त्यांनी रहा बाकिच्यांना दरवाजे खुले आहेत. तुम्ही बोलाल आणि मी वागेन, असा लाचार माणूस मी नाही.", असेही ते म्हणाले. भाजप-शिवसेना युतीच्या काळातील एक किस्सा उद्धव ठाकरेंनी सांगितला. आम्ही भाजप सोबत होतो तर भाजप अन्याय करतोयं काँग्रेस सोबत आलो तर काँग्रेस अन्याय करतोयं हे का, असा प्रश्न त्यांनी शिंदेंना विचारला आहे.
मला वाटलं माझा निरोप समारंभ आहे का?
बाळासाहेब थोरात आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी माझं केलेलं कौतूक ऐकून मला वाटलं माझा निरोप समारंभ आहे की काय?, असा मिश्किल सवाल त्यांनी विचारला. जुन्या पेन्शनवर बोलताना म्हणाले की इतकी महाशक्ती पाठिंबा असताना हरकत काय, असेही त्यांनी विचारले. राज्यात अर्थसंकल्प सादर केला जात असताना पंचामृत ध्येय ठेवण्यात आलं होतं. त्याचं थोडंतरी राज्याच्या कर्मचाऱ्यांवर शिंपडायला हवं होतं, असाही टोला त्यांनी लगावला. पंचामृत कुणी लस्सीसारखं पिणार नाही, असेही ते म्हणाले.
ठाकरेंची रणनिती काय?
महाविकास आघाडीला फक्त एकच करायचं आहे की, त्यांनी निर्माण केलेलं धुकं दूर केलं पाहिजे. पण राज्यात कुणाला तरी भांडत ठेवायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची, अशी कामं सुरू आहे. आपल्याला कुणाला खोट्यात पाडायचं नाही परंतू, लोकांना काय मिळत नाही याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे, असे म्हणत त्यांनी उज्वला योजनेचा दाखला दिला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ठाकरेंनी तुमची लढाईची तयारी आहे का, असा सवाल विचारला आहे.